Tuesday, December 5, 2017

लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा

लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . 
लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा 
---------------------------------------------------------------------------------
१९८४ हे वर्ष असावे , मी त्यावेळी गंगाखेडला होतो. लेखनास नुकतीच सुरुवात झालेली होती, तिथे लेखन करणार्यांचा एक छान ग्रुप जमून आला होता , सर्वश्री .दिनानाथ फुवाडकर सर , प्रा.मधुकर देशपांडे सर , दिलीप शिरपुरकर , अनिल रामदासी , कधी कधी कवी शिवाजी मरगीळ, iइंडिया बकेतील शरदराव कुलकर्णी मांगलेकर , असे अनेकजण एकत्र येऊन लेखन-चर्चा करायचो ,
या उपक्रमात नेहमीच " कथा लेखन प्राधान्याने होत असे, " लिहिलेली कथा पुणे-मुंबई हून प्रकाशित होणार्यांना मासिकांना पाठवली की ती कधी प्रकाशित होते ? " ..ही प्रतीक्षा फार अधीरतेने भरलेली असे , श्री.मधुकर देशपांडे सर मासिकं सुचवत आम्ही त्या मासिकांना कथा पाठवू लागलो , आणि या कथा मासिकातून प्रकाशित होऊ लागल्या .बघता बघता मासिकातून कथा प्रकाशित झालेला एक नवा लेखक म्हणून माझी थोडी थोडी ओळख होऊ लागली याचे श्रेय गंगाखेड ला चालवलेल्या "कथानाद मंडळ "या लेखन उपक्रमाचे आहे. असो.

कथा लेखन जोमाने सुरु असतांना ..एकदा आकाशवाणी " ला कथा पाठवून तर बघू .असा विचार करून मी "सुखाची वाट" ही कुटुंब -नियोजन "संदेस देणारी कथा आकाशवाणी केंद्र -परभणी ला पोस्टाने पाठवली , माझ्या सारख्या नवख्या लेखकाचा काय नंबर लागणार ?, तिथे कुणी ओळखीचे आहे", हा पण आधार नव्हता , कथा पाठवून निवांत बसलो, आली तर छान नाही आली तर ?..त्याहून छान " असा स्वतहाला धीर दिला .

पण ,निराशा वाट्याला आली नाही , आणि आकाशवाणी परभणीचे पत्र मिळाले ..त्यात रेकोर्डिंग साठी येण्याची तारीख होती . मला खूप आनंद झाला , एक नवा अनुभव घेण्याची उत्सुकता होती .
श्रोता म्हणून आकशवाणीशी खूप जवळचे नाते होते ..पण, सादरकर्ता म्हणून पहिल्यांदा माझा आवाज आकाशवाणी वरून इतर श्रोते ऐकणार " ही कल्पना रोमांचकारी वाटणारी होती.
गंगाखेडहून मी परभणीला आलो ..आकाशवाणी केंद्र कसे आहे, कुठे आहे ? कैच माहिती नव्हती , नवा मोंढा रस्ता आहे तिकडे गेलात की सांगेल कुणी पण " या प्रमाणे मी आकशवाणी केंद्रात पोंचलो ..मला आलेले करार-पत्र दाख्य्वले ,
त्यावेळी कार्यरत असलेले कर्मचारी - ज्यांनी माझ्या कथेचे रेकोर्डिंग केले .आता त्यांची नावं नेमकी आठवणार नाही "
आकशवाणीचे कार्यालय आणि स्टुडीओ दोन मजली बिल्डींग मध्ये होता असे आठवते .. रेकोरिंग रूम मध्ये मी बसलो , पण, समोर माईक ,क्षणभर घश्याला कोरड पडली " असे जाणवले ,

माझी अवस्था पाहून -समोर उभ्या असलेल्या साहेबांनी "धीर "दिला , आणि त्यांनी "हं..करा सुरु वाचन .असे खुणावले .."पुढचे २० मिनिटे मी व्यवस्थितपणे माझी कथा वाचन केली ",वाचन करतांना आवाजात योग्य ते चढ-उतार "जमले हो" असे पावती मिळाली ..प्रसारणाची तारीख आणि वेळ सांगितली गेली .."सुखाची वाट " या माझ्या कथेने मला साहित्याची मोठी सुखद अशी नवी वाट मिळवून दिली ..

कारण पुढच्या अनेक वर्षात ..अगदी परभणी सोडे पर्यंत ..सलग २४ वर्षे आकाशवाणी -परभणी साठी मी विविध आणि विपुल असे लेखन करीत राहिलो . सुरुवातीला श्री.कुरील साहेब यांच्याशी परिचय झाला ,त्यानंतर अनेक अधिकारी परिचित होत गेले ..

पुढे काही वर्षांनी आकाशवाणी केंद्र ..स्वतःच्या अद्यावत बिल्डींग मध्ये सुरु झाले .त्या काळात मी देखील परभणीला बदलून आलेलो  होतो , या दरम्यान एक लेखक म्हणून आकाशवाणीत  अनेक वेळा मला जाण्याचा योग येत गेला.
सर्वश्री .प्रभाकर कानडखेडकर , विजय रणदिवे , खासनीस , हे कार्यक्रम अधिकारी दर भेटीत अगदी आपलेपणाने बोलत ,लेखन विषयक चर्चा व्हायच्या.

महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या गुरुवारी .संध्याकाळी प्रसारित होणार्या .."राम राम मंडळी .या कार्यक्रमात सादर होणार्या "श्रुतिका -साठी मी भरपूर आणि नियमित लेखन केले ..या श्रुतीकेत चार पात्र - तात्या , शांताक्का , अनुताई  आणि गुरुजी .असायची ..दिनविशेष आणि सांस्कृतिक ,सामाजिक घटना यांची माहिती देणाऱ्या या कार्यक्रमा साठी लेखन "खूप मोठा अनुभव होता .
संजीवन पारटकर , सतीश जोशी , विजय रणदिवे , जयश्री लांबडे ..या श्रुतीकेत सहभागी असत ..
माझ्या सवांद- लेखनाला  माझ्या या कलावंत -मित्रांनी जनमानसात अतिशय प्रभावीपणे पोन्च्वले ", याची प्रचीती 
श्रोत्यांची पत्र येत असत ..त्यातील माझ्या श्रुतिका लेखनास खूप छान अभिप्राय आलेले असत.

ग्रामीण परिसरातील बाल-मित्रांसाठी मी खूप गोष्टी लिहिल्या आणि मुलांसाठीच्या कार्यक्रमातून सदर केल्या ,
या गोष्टी मुलांना खूप आवडत ..आकशवाणी -परभणी केंद्राने माझ्या या  बाल-कथा नंतर  अनेक वेळा पुनर:प्रसारित 
केल्यात ..ही माझ्या साठी आनंदाची गोष्ट आहे. सुश्री - जयश्री लांबडे बालमित्रांसाठीचा कार्यक्रम सदर करीत , माझ्या कथांना खूप छान प्रतिसाद मिळतो .हे त्यांच्या कडून ऐकणे म्हणजे लेखनास प्रोत्साहन देणारे असे.

आकशवाणी केंद्रातला रेकॉर्डिंग स्टुडीओ..खूपच छान आहे ,याचा आरंभ "माझ्या कथा सादर करण्याने झाला आहे" ही आठवण या निमित्ताने सांगावीशी वाटते.
मी आमच्या बँकेच्या विद्यापीठ शाखेत कार्यरत असतांना म्हणजे ..१९९६ ते २००३ .या ६-७ वर्षांच्या काळात मला आकशवाणी साठी लेखन करण्याची संधी मिळाली ..,परभणी -केंद्रावरून प्रसारित होणार्या त्या काळातील बहुतेक सर्व कार्यक्रमातून मी माझे लेखन सदर केले  जे -  कथा , बाल-कथा , श्रुतिका , भाषण , कविता ..अशा विविध स्वरूपाचे होते..
रेकॉर्डींगच्या दिवशी आकाशवाणीत आले की ..सतीश जोशी , संजीवन पारटकर यांच्या भेटी व्हायच्याच  ,  त्यातून आकशवाणी साठीचे लेखन ,लेखन -स्वरूप .आणि इतर लेखन याबद्दल खूप उपयुक्त अशे बोलणे व्हाव्यचे ...आज या मित्रांच्या सहवासाचा ,त्यांनी आपलेपणाने केलेल्या  चर्चेचे महत्व जाणवते ..कारण या मित्रांशी केलेल्या चर्चेने आणि  आकशवाणी साठीच्या केलेल्या लेखनाने ..मला काही महत्वाचे शिकण्यास मिळाले ..

जसे ..विषयानुरूप नेमके आणि मुद्देसूद लेखन करणे , शब्दरचना सुबोध ,वाक्य समजण्यास सोपी असली पाहिजे., मनोरंजन हा उद्देश प्राथमिक आणि प्रबोधन प्राधान्याने करीत अस्तंना ..जे श्रोते ऐकणारे आहेत ..त्यांना हे त्यांच्या भाव्तालीचे ,त्यांच्या सबंध असलेले वाटले पाहिजे .."
माझ्या लेखनावर या सर्व सूचनांचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे.  माझ्या कथा-संग्रहात आणि बाल-साहित्याच्या पुस्तकात .आकशवाणी वरून प्रसारित झालेल्या कथांचा आणि गोष्टींचा समावेश केला होता. आज ही पुस्तके प्रती रुपात उपलब्ध नाहीत .
मित्रानो - तुमचे आभार मानवे तेवढे कमीच आहेत .

आकाशवाणी परभणी केंद्रातील सर्वच सहकारी आमच्या सारख्या साहित्यिक मंडळींशी आस्थेने बोलत, स्वागत करीत ..त्यांच्या मनाच्या मोठेपणा मनात कायमस्वरूपी आहे.
माझ्या  दोन मित्रांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ  शकत नाही..

(स्व.) -कवी मित्र - प्रकाश ताडले ..कार्यक्रम अधिकारी असतांना ..कविता विषयक खूप छान कार्यक्रम सादर झाल्याचे आठवते त्यावेळी ..अनेक नामवंत कवी आवर्जून आकाशवाणी केंद्रात येत.. या सर्वांच्या भेटी अजून स्मरणात आहेत.

पारिवारिक स्नेही आणि मित्र .(स्व.) नीलकंठ कोठेकर - याच्या कार्यकालात लेखन विषयक ,कार्यक्रम विषयक सविस्तर अशी चर्चा होत असे .

लेखक आणि कवी -बाल-साहित्यिक म्हणून माझ्या वाटचालीत या सर्व मित्रांचा आणि आकशवाणी- परभणी केंद्राचा खूप महत्वाचा वाटा आहे.. एका  अर्थाने ..आकशवाणी परभणी  म्हणजे- माझी लेखन-कार्यशाळा "आहे.
मित्र हो आपल्या विषयी माझ्या मनात सदैव कृतद्न्य -भावना आहे.
वाचक मित्रहो ..पुढच्या लेखात ...परभणी बद्दल असेच काही ...!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . 
लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला - आठवणीतील गावं - परभणी . लेख-६ वा - डॉक्टर यु आर दी बेस्ट ...! ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------

लेखमाला - आठवणीतील गावं - परभणी .
 लेख-६ वा - 
डॉक्टर यु आर दी बेस्ट ...!
ले- अरुण वि.देशपांडे 
------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो ,
गेल्या आठवड्यातील लेखास इंटरनेटवरील वाचकांनी सुद्धा तुमच्यासारखाच भरभरून प्रतिसाद दिलाय, तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो. 
आजच्या लेखात आदरणीय अशा डॉक्टर असलेल्या माझ्या एका मित्राबद्दल  व्यक्त होणार आहे ,
हे आहेत तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचे ...
- डॉ गिरीश .वेलणकर .
परभणीच्या माझ्या वास्तव्यात  मला हे  अतिशय निष्णात डॉक्टर, एक  मित्र म्हणूनही लाभले .

" जीवनविषयक अतिशय स्पष्ट दृष्टीकोन , जीवन-मुल्यांचा सचोटीने आणि निर्धाराने पुरस्कार करण्याचा ध्येयनिष्ठ स्वभाव , विचार आणि आचार या दोन्हीत एकरूपता असली पाहिजे .असे नेहमीच आपण ऐकतो, वाचतो पण याची प्रत्यक्ष्य अनुभूती . . मी नेहमीच घेतली आणि तितकीच ती डॉ.वेलणकर यांच्या सहवासात अनुभवली .

ऑक्टोबर -१९८६ मध्ये २१ वर्षांच्या प्रदीर्घ अशा काल-प्रदक्षिणे नंतर पुन्हा परभणीला आमची वापसी झाली , 
आणि ..जुनी  हैद्राबाद बँक कॉलोनी - , रामकृष्ण नगर .पेट्रोल पंप च्या मागे .वसमत रोड .परभणी असा आमचा पोस्टल पत्ता झाला .वडिलांच्या काळातील ही कॉलनी ..इथे आमचे प्रशस्त घर होते , त्यातील चार रूम मध्ये बँकेतील एक ऑफिसर आणि पारिवारिक घरोबा असलेले .भीमाशंकर पाठक परिवारासहित रहात होते ,आणि बाजूच्या तीन रुमच्या ब्लॉक मध्ये बँकेतील  सहकारी मित्र .श्री .गिरीश कऱ्हाडे त्यंच्या फमिली सहित राहत होते ..(..ता. क...आजचा नामवंत व लोकप्रिय कलाकार ..संकर्षण कऱ्हाडे  याचे आई-बाबा ....) .
आमच्या येण्याने गिरीशराव स्वगृही परतले .आणि आम्ही  परभणीत आमच्या या घरात  नव्याने स्थिर होऊ लागलो.

नव्याचे नौ - दिवस सरले .मुलं लहान होती ..त्यांचे आजारी पडणे ,खेळतांना पडणे -मार लागणे हे सगळे यथासांग सुरु झाले त्यामुळे  डॉक्टर शोधणे .हे आलेच ..पण हा प्रश्न पडण्य आधीच सर्वांनी सोडवला ,.माझ्या परिचयातील त्यावेळच्या सर्वंनी  एकमुखाने .
 डो.गिरीश नारायणराव वेलणकर हे  एकच एक नाव सुचवले,आणि  सांगितले 
..त्या प्रमाणे ..आम्ही सहपरिवार त्यांचे  नोंदणीकृत पेशंट झालो ..हे आज ही मोठ्या सन्मानपूर्वक भावनेतून सांगू इच्छितो .
डॉ.वेलणकरच्या व्यक्तिमत्वाचा  प्रभाव नंतरच्या  प्रत्येक भेटीत पडत गेला , अजून मी त्यांच्या या "सरस -व्यक्तिमत्वाच्या .प्रभावाखाली जसाच्या तसा आहे.

माझ्या आठवणी प्रमाणे सुरुवातीला काही दिवस .गांधीपार्कला वेलणकरांचा दवाखाना होता , पुढे तो रामकृष्ण नगरच्या बँक कॉलोनीच्या शिवाजी कॉलेजच्या बाजूने येणाऱ्या आतल्या रोडवर होता ..पुढे काही वर्षांनी त्यांनी स्वतःच्या बंगल्यात ..पुढच्या भागात दवाखाना सुरु केला .. अनेक वेळा  फमिली सहित पेशंट म्हणून माही त्यांच्या समोर बसायचो ..त्यावेळी  आमची स्थिती "  मोठ्या सरांच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या आज्ञाधारक विद्यार्थी "  अशी होऊन जात असे ...

एक आठवण अशीच आहे...
थंडी वाजून आलीय म्हणून दाखवून यावे म्हणून  आलेलो मी , त्यांच्याशी बोलतांना विसरूनच गेलो , की थोड्यावेला पूर्वी  हूड हुडी भरल्या अंगाने मी  इथे आलो , कशासाठी आलोय .हे ऐकून घेत .डॉ.वेलणकर असे काही सस्मित चेहऱ्याने पहात की ..तिथल्या तिथे आम्हाला वाजणारी थंडी जणू थंडगार होऊन जायची., 
माणसाने किती व्यवस्थित आणि शिस्तशीर असाव ? मित्रानो ..डॉ.वेलणकर यांना भेटा .तुमचे मन संतोष पावेल.

वेलणकर माझ्या साठी फक्त एक डॉक्टर नाहीत .. एक व्यासंगी आणि  अभ्यासू वाचक  आहेत,साहित्य विषयक त्यांची स्वतःची एक स्वच्छ आणि ठाम अशी भूमिका आहे " , हे मला अनेक वेळा त्यांच्या सहवासात जाणवले.
त्यांचा आणि त्यांच्या समविचारी मित्रांचा एक वाचक ग्रुप आहे .. या माध्यमातून त्यांची वाण्ग्मयीन जडण-घडण अतिशय जाणीवेची झाली आहे असे मला वाटते .त्यांचा साहित्यिक आणि लेखन प्रवास "या जाणिवांच्या मार्गावरून चालू  आहे 

त्यांच्या बरोबर अनेकदा साहित्य-विषयक संवाद भेटीचा आनंद मी घेतला आहे .१९८८ नंतर मी श्रीराम नगर बँक कॉलोनीतल्या "वरदान " या घरात वास्तव्यास गेलो . श्रीराम नगर मध्ये आम्ही सर्व मिळून सांस्कृतीक कार्यक्रम करीत असुत , यातील कार्यक्रमाना यावे अशी आमची विनंती डॉ.वेलणकर नेहमीच मोठ्या आपलेपणाने मान्य करीत .याचे कारण म्हणजे .आमची कॉलोनी त्यांची फक्त पेशंट नव्हती .तर त्यांची "FAN " होती .या उत्सवात त्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाण -पत्र " आज २५ वर्षा नंतर ही श्रीराम नगर मधील मित्रांच्या संग्रही मोर-पिसा सारखे जपून ठेवलेले सापडेल.
डॉ.वेलणकर यांच्या सारख्या  विचक्षण -वाचकाच्या संग्रहात माझी पुस्तके  आहेत ,माझ्यातील साहित्यिकाला हे गोष्ट खूप आनंद देणारी आहे.
स्वामी विवेकानंद साहित्य दहा खंड ,आणि हिंदी अनुवाद ग्रंथ ही अनमोल अशी ग्रंथ संपत्ती केवळ डॉ.वेलणकर यांच्यामुळे लाभली .
नंतर नंतर काय झाले की .. आम्ही आमच्या मूळ स्वभावावर गेलोच .... शेवटी  आमच्या सारखे बेशिस्त ..आणि वेळेनुसार न वागू शकणार्या पेशंटला  डॉ.वेलणकरांनी अगदी साभार आणि सविनय साभार परत पाठवले , याचा अर्थ असा नाही की ..पुन्हा आम्ही कधी एकमेकांना भेटलोच नाही ..
अनेक कार्यक्रमात ..हसतमुख डॉ.वेलणकर यांची भेट होत असे.आणखी एक खास आठवण आहे ती त्यांच्या सामाजिक  कार्याची ..त्यांच्या मुळे आम्ही विद्यार्थ्यांना मदत करू शकलो , त्यांचा निरोप आला की, श्रीराम नगर तर्फे यथाशक्ती या मदत कार्यात आमचा सहभाग व्हायचा .

मला आठवते .२००२ -२००३ मध्ये .परभणी .मुख्य शाखेत ..खास बँक कर्मचार्यासाठी डॉ.वेलणकर आणि डॉ.सतीश बापट सर यांनी दोन आठवड्यांचे एक बिशेष योग-साधना शिबीर घेतले होते ...वेळ सकाळची ..५.३० चे असावी ..अशी आरोग्यदायी पहाट माझ्या आयुष्यात तरी पुन्हा आली नाही , त्या शिबिरात डॉ.वेलणकर यांनी सर्वांना एक सचित्र पेपर दिला होता ..जो पाहून योगासने सहजतेने करता येतात ,
 डॉ.वेलणकर ..अहो.. योग योगाने हा सचित्र पेपर अजून माझ्या जवळ जसाच्या तसा आहे .,पण ! पुढचे ..तुम्हाला काय सांगावे ? जाऊ द्या .

सर्वार्थाने  " परभणी  -भूषण " शोभावेत असे डॉ.वेलणकर माझे मित्र आहेत ही माझ्यासाठीचे मोठेच "भूषण" आहे.
डॉ.गिरीश वेलणकर " यु  आर दि बेस्ट ...!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेखमाला - आठवणीतील गावं - परभणी .
 लेख-६ वा - 
डॉक्टर यु आर दी बेस्ट ...!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 

लेखमाला -आठवणीतील गाव - परभणी - लेख- ५ वा एका कासवाची तीर्थ -यात्रा ..! ले- अरुण वि.देशपांडे . -----------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतील गाव -
परभणी -
लेख- ५ वा 
एका कासवाची तीर्थ -यात्रा ..! 
ले- अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो ,
जुन्या दिवसांची आठवण तुमच्या सोबत शेअर करण्याचे हे क्षण खूप मोलाचे आहे,भावनिक नाते अधिक दृढ करणारे हे लेखन आवडल्याचे तुमच्या प्रतिक्रियेतून कळते ,हा आनंद कित वेगळा आहे, तुम्हीच हे समजू शकता ..
गेल्या लेखात आपण माझ्या १९६४ या वर्षा पर्यंतच्या आठवणी जाणून घेतल्यात .. या नंतर १९६५ ते १९८६ ..अशी २१ वर्ष मी आणि आमचा सर्व परिवार परभणीला -येथील वास्त्ब्याला दुरावलो होतो .याचे कारण ..वडिलांची प्रमोशन वर ऑफिसर म्हणून बदली झाली ती हैद्राबाद बँकेच्या हेड ऑफिसमध्ये..आणि मग पुढचे दोन दशके हा दीर्घ कालावधी जीवनाला अनेक अर्थाने संपन्न करणारा असाच आहे..या काळातील प्रवासाविषयी या वेळी नेमक्या काय भावना आहेत..हा आजच्या लेखाचा विषय आहे..
अलीकडे मनाला एक मोठा खुळा-नाद लागला आहे बघा .. थोडासा एकांत आणि निवांत वेळ मिळाला की.. मनाने मी पार लहानपणाच्या दिवसात जाऊन लहानपण अनुभवतो, तर कधी .शाळा -कोलेजच्या दिवसात भटकून येतो ..तर कधी ..ज्या बँकेत ३३ वर्षे नोकरीच्या निमित्ताने होतो ..त्या बँकेच्या आठवणीत रमून जातो ..पारिवारिक आठवणी तर ,लडिवाळपणाने  मनाला कायम बिलगुनी असतात ... असे कातर -विव्हळ  होणे -हे म्हातारपणाचे  प्रमुख असे भावनिक  लक्षण आहे  असे माझे मत झाले आहे ..

माझा हा आयुष्य प्रवास -एक तिर्थ- यात्रा आहे असे मानतो.. आणि "कासव " हे रूपक मला माझ्यासाठी सर्वाथाने योग्य वाटण्याचे कारण- असे आहे ..
कासव स्वतःच्या ..मर्यादा ओळखून .... स्वतःला भोवतालीच्या घाई-गर्दीपासून वेगळे ठेवत .जी काय ध्येयपूर्ती मनाशी ठरवली असेल ..त्या पूर्तीसाठी ..पुढे पुढे चालतच जात असते  तसेच आपण आपल्या मार्गाने चालत राहावे . . कासवाने माघार घेतलीय ? असे कुणी सांगितल्याचे मला तरी आठवत नाही  ..गती कासवाची ..आणि मती  सुद्धा त्याच्या सारखीच .अविचल असावी असे मला वाटत आले आहे.

. मंदिरातील .दर्शनासाठी गेलो की ..भगवंताच्या दर्शन सोबत  मी कासव..दर्शन पण घेत असतो .किती छान योग आहे न कासवाला लाभलेला - .." त्याला .मंदिराच्या निरामय वातावरणात सत्संग आणि संतसंग दोन्ही घडत असतात ..त्याच्या सारखाच सत्संग आपल्यालाघडावा  राहावा -कारण - कानावर पडत गेले की आपोआपच ते मनापर्यंत झिरपत जाते , आपल्याला ..त्यासाठी ."माणसातले देव भेटायला  हवेत..
माझ्यातल्या "कासवाची  तिर्थ- यात्रा " ही त्रिगुणात्मक- तीन-व्यक्ती स्वरूपातील आहे. आहे.. श्री दत्तगुरूंच्या कृपादृष्टीची ही प्रचीती आहे.
हे त्रिगुण - तीन-रूप.--- एक- मी-एक -प्रापंचिक -गृहस्थ आणि माणूस ,
 दोन- पोटा -पाण्यासाठी नोकरी करणारा माणूस ,
 तीन- कलागुण लाभलेला - एक साहित्यक, संगीताची -कलांची आवड असणारा एक रसिक..

माझ्यातील  तीन स्वतंत्र प्रवाह आहेत ..तरी ते एकरूप आहेत ..वेगवेगळे करता येणार नाहीत असे हे तीन प्रवाह , रंग वेगवेगळे ...त्यामुळे ..
एक - 
घरातील वावर - पती- पिता - आजोबा - , संसार -प्रपंच दोन्ही यथाशक्ती छानच पार पाडलेत 
दोन -
. बँकेत  असतांना -   नोकरी आणि कामाला कायम प्राधान्य दिले शिवाय , - कुशल कामगार श्रेणीत होतो मी,   नेहमीच सगळ्या पेक्षा चार टोपली जास्तीचीच टाकली ..याचे समाधान मला आहे.
-तीन -
-साहित्यिक -म्हणून वावरतांना - सर्वात मिसळून जात आनंद देणे आणि घेणे .. साहित्य क्षेत्रात - आधी कार्यकर्ता ..मग  लेखक-कवी वगेरे ..,
यांची कधीही गल्लत होऊन  " एक-ना धड -भराभर चिंध्या " अशी अवस्था होणार नाही ..याची काळजी घेत आलो आहे.
 माझ्या आता पर्यंतच्या तीर्थ-यात्रेत .विविध .गाव ..त्यातली काही माझ्यासाठी माझी कर्म-मंदिरा सारखी आहेत , काही गाव- माझ्यासाठी .गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींची म्हणून -.श्री-सद्गुरूंची निवासस्थानं आहेत , आणि काही गावांनी ..तिथल्या मोठ्या मनाच्या मित्रांनी मला घडवल ,
या सर्व ठिकाणी .सर्व गावी स्नेहीजनांचा ..आपल्या माणसांचा मायाबाजार कायम भरलेला असतो ..तो किती ही काल जावो जसाच्या तसा भरलेला असणार आहे.

माझे वडील ती.विठ्ठलराव हनुमंतराव देशपांडे -लोहगावकर ..परभणी ..हे आणि मी एकाच बँकेत नोकरीला होतो ,
त्यांच्या बदली मुळे, आणि नंतर माझ्या स्वतहाच्या नोकरीत झालेल्या माझ्या बदल्यामुळे ..अनेक गावाला आम्ही राहिलो ..ही सर्व गाव माझ्यासाठी तीर्थ-क्षेत्र आहेत..
या २१ वर्षातील प्रवासाचा हा अल्पसा उल्लेख करतोय ..कारण प्रत्येक गावातील वास्तव्य आणि काळ.हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
 १९६५ ते  १९६७ - हैद्राबाद .इथे  एच एस सी झालो आणि बालपण सरले ..
१९६७ इये १९७१ - आष्टी -जी. बीड- याच काळात अंबाजोगाई च्या योगेश्वरी महाविद्यालयात शिकलो ,बी.काम चा विद्यार्थी होऊन मी होस्टेलमध्ये राहत असे.

आपल्याला सामुहिक आणि सार्वजनिक जगण्यात मनभेद आणि मतभेद " आता जितके जाणवतात ते इतके तीव्रतेने कधी जाणवत नव्हते ,
पारिवारिक आणि कौटुंबिक जीवन आर्थिक -दृष्ट्या भले ही संपन्न नव्हते ..पण.माणसांची मनं खूप मोठी आणि आणि श्रीमंत होती . वाड्यात आणि चाळीत रहाणारी  माणसे ..भक्कम मनाची होती ..त्यांच्या आधारामुळे साधी सुधी माणसे त्यांच्या भावनिक जगात सुखी आणि समाधानी होती . आपलेपणाच्या  भावनेमुळे ..प्रेमाचा हक्क गृहीत धरला जात असे.  आजूबाजूच्या परिवारातील मुलं -मुली सुद्धा कधी परकी नव्हती-..दुसर्याची नव्हती .तर आपलीच सगळ्यांची लेकरं असायची ..

मी हे सगळं अनुभवलंय ..ज्या ज्या गावी मी राहिलो .त्यातले .हैद्रबाद सोडून ..बाकी सर्व लहान गाव होती पण.या सर्व ठिकाणी मला  माणुसकीची चाड असलेली माणसं दिसली ,भेटली ." .ज्यांना इतर  माणसांची काळजी होती ,त्याच्या साठी खूप काही  तरी करीत राहण्याची त्यांची धडपड असायची..लष्कराच्या भाकरी भाजणारे " निस्वार्थी लोक..या पिढीतच सर्रास आजुबाजू वावरतांना दिसत असत .
आष्टी नंतर ..अहमदपूर , मग परळी वैजनाथ , उदगीर ,ही गाव झाली ..

दरम्यान १९७३ मी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीला लागलो .. मग माझ्या बदल्या झाल्या .. १९७६ ला लग्न झाले .. आणि आमच्या तीर्थ-यात्रेत एका मोठ्या क्षेत्राची भर  पडली .ते गाव आहे- हिंगोली .
. हिंगोलीच्या  ..बसोले परिवारातील  -मीनाक्षी , आमच्या देशपांडे परिवारातील नव्या पिढीतील मोठी सुनबाई म्हणून प्रवेशली .त्याला  आता ४१ वर्षे झालीत .. मोठ्या चतुरतेने आणि कुशलतेने सर्व कारभार आणि सूत्र ती सांभाळते आहे .

१९७६ साली कर्नाटक बिदर जिल्ह्यातील कमाल नगर आणि  औराद -संतपुर या दोन गावी काम केले . नंतर बदली होऊन ३ वर्ष नंतर मी पुन्हा मराठवाड्यात आलो ते जिंतूर ला .. हे माझे आजोळ गाव. त्यामुळे बँकेत काय आणि नंतर काय .आजोळच्या गावातील माणसांचे प्रेम मी मनोसक्त अनुभवले.

१९८० -छावणी शाखा औरंगाबाद ला बदली झाली आणि मी आमच्या पूर्ण परिवारा सोबत राहिलो ..खूप छान वर्षं होती ही. पुन्हा बदली .
.१९८२ ..गंगाखेड. इथल्या ३ वर्षांच्या वास्तव्यात ..संतजनाबाई च्या  गंगाखेड मध्ये माझ्या साहित्य लेखनास सुरुवात झाली ..ती गेली ३५ वर्षा पासून सातत्याने -अखंड चालू आहे.. गोदावरीच्या निर्मल प्रवाहाने ..माझ्या लिखाणाला एक निर्मल आणि संस्कारी रूप दिले आहे असे मी मानतो.

१९८६ ते २००६ ..ही वीस वर्ष ..दोन दशके ..परभणीला माझ्याच गावी नोकरीला होतो. इथेच कार्यकर्ता आणि साहित्यिक म्हणून मी घडलो .. दुनिया मे जर्मनी -भारत मे परभणी " हे आता सर्व परिचित आहे. त्याच माझ्या गावात मी लिहिता साहित्यिक झालो .. तिथे मला काय काय करायला मिळाले ..हा विषय एका स्वतन्त्र पुस्तकाचा आहे..
माझ्या आयुष्य आणि लेखन प्रवासातील ही सुवर्ण -पानं आहेत ..ते या नंतरच्या अनेक लेखातून सविस्तरपणे येणारच आहे.

..मित्रांनो  माझ्या तीर्थ- यात्रेतला हा पाडाव आणि तुम्हा सर्वांच्या स्नेहाची शिदोरी .मला नवी उभारी देणारे आहे. माझ्यातल्या कासवाची ही तीर्थ - यात्रा आपल्या सर्वांच्या स्नेह-बळावर अशीच चालू राहावी ही इच्छा आणि विनंती.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेख- आठवणीतील गावं 
एका कासवाची तीर्थ-यात्रा ..! 
ले- अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी , भाग-४ था . - प्रिय मित्राची " अमर " आठवण .

लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी ,
 भाग-४ था . - 
 प्रिय मित्राची " अमर " आठवण .
ले- अरुण वि.देशपांडे 
-------------------------------------------------------------
नमस्कार - परभणीकर मित्रानो आणि वाचक मित्रांनो  , मागच्या लेखात १९६४ या वर्षच्या संदर्भातल्या आठवणी शेअर केल्या , मला ,तुम्हाला त्या आवडल्या हे तर छान वाटणारे आहेच आहे , पण फेसबुक आणि इंटरनेटवरील माझ्या मित्रांना परभणी -बद्दल वाचून खूप छान वाटते आहे ", तो काल, त्या आठवणी त्यांनाही खूप सुखद वाटल्या "हे मला जास्त मोलाचे वाटते कारण असे काही विस्मृतीले क्षण पुन्हा उजळणी केल्यावार मनाला खूप आनंद देता येतो हा माझा ,तसाच तुमचा देखील अनुभव असेल.
माझा त्याकाळातील क्लासमेट ,आणि आज ही मित्र असलेला डॉ.अशोक कुलकर्णी शेलगावकर यांनी तर फोन करून सांगितले की आताच सांगून ठेवतोय - तुला परभणीला यायचे आहे - कारण येत्या डिसेंबर महिन्यात परभणीला एक मित्र-मेळावा मी घेतो आहे . विशेष म्हणजे या मेळाव्यात तुझ्या लेखात तू ज्या मित्रांचे नामोल्लेख केले आहेस ते मित्र तर आहेच या शिवाय अनेक  पुराने -दोस्त " असणार आहेत  चला ,परभणीला येण्याचे पक्के झाले ., डॉक्टर अशोक कुलकर्णी  तुम्ही खूप मोठा आनंद देण्याचे कार्य करीत आहात ,धन्यवाद तुम्हाला .

डावरे चष्मेवाले -मधील श्रीमान विजय डावरे हे देखील माझे जुने -दोस्त-मित्र -फ्रेंड आहेत ..लेख वाचून त्यांना खूप छान वाटले ..म्हणाले ..विजय फोटो  स्टुडीओ- स्टेशन रोड आठवतो की नाही अरुण ?
विजय हे काय विचारणे झाले राव - या दुकानाने तर आपल्याला मित्र बनवले ..आणि ज्याच्यामुळे अनेक मित्रांना ही जागा कायम आपलेच घर " वाटत असे ..तो .दोस्त- यार ..अमर परिहार ..

मित्रांनो आजच्या लेखात या सर्वप्रिय मित्राची आठवण करू या ..अमर परिहार याच्याशी मैत्री  नसलेली व्यक्ती ",परभणीच्या सार्वजनिक जीवनात सापडली नसती "असे नक्कीच म्हणता येईल .. अमर तर आमच्या परिवारातील एक मेंबर होता ..यशवंत चौधरी ,रविकांत चौधरी .रवी टेलर्स -च्या रोडवर विजय फोटो स्टुडीओ मध्ये -अमर असायचा ,अमर दिसायचा ,आल्या गेल्याशी दिलखुलास हसून बोलणारा अमर - म्हणजे या रोडवरचा एक स्पीड-ब्रेकर "होता , इथे थांबून मगच पुढे जायचे ..हे त्या रस्त्याने जाणार्या-येणार्यांची सवय होती.

मला .१९७० -७५ च्या दरम्यानचे दिवस आठवतात ..मी शनिवारी-रविवार सुट्टी असली की .परभणीला रवी-टेलर्स कडे येत असायचो , हे दोन दिवस .सगळा वेळ अमरच्या विजय फोटो स्टुडीओ मध्ये जायचा, गप्पा,हसणे-खिदळणे .आणि फिल्मी-गाण्यांच्या गप्पा ..या काळात आणि या जागेत .मैफिली इतक्या रंगवल्या की  पुन्हा अशा मैफिली कधीच जमल्या नाहीत की रंगल्या नाहीत ,
त्यावेळी जवळच अफजल हॉटेल .. तिथला चवदार -आलू-बोंडा , रसाळ गुलाब्जांबू , आणि फर्मास चाय ..दोस्तांनो , काय माहौल असायचा ..बोलता -बोलता खाणे , खाता-खाता गाणे , आणि हसता हसता लोटपोट होणे " असे चित्र हमखास असायचे .
 अशा दिलदार मैफिलीतले आम्ही को-मेंबर .विजय डावरे अरविंद वाघमारे ,यशवंत चौधरी , रमेश मंगरुळकर ,कधी नांदेड हून आलेले मोठे बंधू -सुरेश मंगरुळकर , आणि लोकल परभणी मित्र , एखद्या सोहोळ्याला आवर्जून हजेरी लावावी तसे माझ्या सारखे अनेक मित्र या जागेत येऊन.."रात्र- जागवित असत ", अशा अनेक "जागल्या -दोस्तांना .अमरच आठवण नक्कीच भारावून टाकणारी असेल.

आबासाहेब वाघमारे .गोविंदराव आळनुरे , डी.आर.चिनके , या गंगाखेडकर मित्रांचे ठेपे अमरचे दुकान असायचे या सर्वांशी   माझ्या ओळखी या ठिकाणी झाल्या . अमर आणि त्याचे मित्र ..त्याने जमवलेला त्याचा परिवार ही त्याची मित्र-प्रेमातून कमावलेली "खरी-कमाई " होती असे मला वाटते .यथावकाश अमर ने पुढच्या एका चौकात .स्वताचे दुकान सुरु केले ..अमर फोटो स्टुडीओ.. या नवीन दुकांची जागा भलेही बदलली असेल ..पण.. अमर कडे आवर्जून येणारे दोस्त तेच कायम राहिले ..दिवसे दिवस त्यात भर पडत गेली होती...
यशवंत -रविकांत चौधरी या त्याच्या मित्रांचे मामा -मामी ,म्हणून मग माझे आई-वडील .आपोआपच अमरचेपण  .मामा-मामी ,आणि आमची  सर्व फ्यामिली ..त्याची झाली. 
१९७७ साली आम्ही -म्हणजे माझे आई-वडील .सेलू च्या हैद्राबाद बँकेत होते ,आजोबा-आजीच्या घरी  ..माझ्या मुलाचे बारसे झाले ..या कार्यक्रमाला क्यामेरात  बद्ध करणारा ..बेस्ट क्यामेरा -मन ..अमर ' होता .. काही दिवसांनी  त्याने  बाळाला ..फोटो -फ्रेम दिली 
त्यावर .एकाच " A" madhye  दोन नाव होती .. Amar to Amit ...!
अजूनही हा फोटो पाहिला की दिलखुलास हसणार्या अमरचा -सदाबहार चेहेरा नजरेसमोर तरळून जातो .

हैद्राबाद बँक, बँकेतील स्टाफ..म्हणजे अमरचे सगे-सोयरे असल्या सारखेच होते ..बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची खातिरदारी .आणि त्यांची काळजी यजमान असल्या सारखा दस्तूर खुद्द - .अमर घेत असे .. इतकी त्याला -हैद्राबाद बँकेची  आणि बँकेला आणि  त्याची सवय झालेली होती....  .या ऋणानुबंधाच्या गाठी अजूनही आठवणींच्या रेश्मिगाठी सारख्या मनात आहेत..

१९८० च्या दशकात ..परभणीला .कारेगाव रोड-  - देशमुख हॉटेल जवळ -श्रीराम नगर ..हैद्राबाद बँकेच्या स्टाफची दुसरी कॉलोनी  झाली  ," पाण्याच्या टाकीजवळ - ही आमच्या कॉलनीची ठळक खुण आहे. अमरचे मित्र -आबासाहेब वाघमारे यांचा प्लॉट माझ्या शेजारी .,.पुढे या प्लॉट मध्ये घर बांधून माझा शेजारी म्हणून आला ..तो अमरचा धाकटा भाऊ ..ब्रीजनाथ परिहार ,. .या पडोसी मुळे- अमरच्या आणि आमच्या मैत्रीतले पारिवारिक नातेबंध अधिक दृढ झाले ..दरम्यानच्या काळात विजय फोटो स्टुडीओ- ते --  अमर फोटो स्टुडीओ "हा  अमर या मित्राने केलेला  सर्व प्रवास म्हणजे एका व्यक्तीचा आणि , एका माणसाचा  सोपी वाट नसलेला एक प्रवास होता . पराकोटीचा आशावाद , आणि जिद्द त्याच्या स्वभावात मी नेहमीच अनुभवली . त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विषयी त्याच्या मनात इतका जिव्हाळा होता की, त्याच्याच दोन मित्रांनी एकमेकाचा हेवा करावा .."हा तर माझ्या पेक्षा जास्त जिगरी आहे की काय अमरचा ?
फोटो स्टुडीओच्या मागेच छोट्याश्या घरात अमर आणि परिवार असायचा ..या घरात येणाऱ्या मानसला नेहमीच ऐसपैस आणि मोकळे वाटेल असा अमरचा पाहुणचार असायचा , पुढे वसमतरोडला त्याचे स्वतःचे मस्त घर झाले ..त्याचा गृहप्रवेश समारंभ .पारिवारिक मेंबर म्हणून आम्ही अनुभवला .
जसे वर्ष जातात ,आपणही समोरच्या परिस्थितीनुरूप बदलत जातो , सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या न राहता त्यात ही बदल होत जातो ..असे बदल स्वीकारत पुढे जाणे .आपल्या हिताचे असते ... मित्रांनो ..हा अनुभव सिध्द गुरु-मंत्र ..अमर नावाच्या गुरु- मित्रांने ..आपल्याला त्याच्या शब्दातून कधीच न बोलता त्याच्या वागण्यातून  दिला आहे अशी माझी भावना आहे.
सतत मुक्तहस्ते आनंद वाटणारा आपला  दोस्त अमर , आणि आनंद सिनेमातला .आनंद ..मला तर हे दोघे एकमेकांचे फास्ट--फ्रेंड आहेत असेच वाटत असते .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी ,
 भाग-४ था . - 
 प्रिय मित्राची " अमर " आठवण .
ले- अरुण वि.देशपांडे .
मो- 9850177342 
------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, October 25, 2017

लेखमाला - आठवणीतील गाव -परभणी . भाग - ३ रा

लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी -
 भाग-३ रा . 
ले- अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार ,
या लेखनास आपल्या प्रतिक्रिया खूप प्रोत्साहन देणाऱ्या आहेत ,या बळावर हे लेखन करणे खूप आनंददायक आहे. 
सध्या दिवाळी चालू आहे .या निमित्ताने आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
परभणीकर असूनही तसा दूर दूर राहिल्यामुळे असल्यामुळे लहानपणापासून पाहिलेल्या परभणीच्या आठवणीत एक सलगपणा असा नाहीये .तरीपण मला लख्खपणे आठवतात अशा काही आठवणी आठवून तुमच्याशी शेअर करणे खूप छान वाटणारे असेच आहे.

मी ८-१० वर्षे वयाचा होतो ती वर्ष आहेत १९५८ -१९६०  या दरम्यानची ,जवळपास पन्नस वर्षापूर्वीचे हे दिवस आहेत.,
१९५० ते १९६० अशी दहा वर्ष माझे वडील .मानवत च्या हैद्राबाद बँकेत हेड-कॅशियर  होते. या दिवसात परभणीला येणे असायचे ,पण इतक्या लहानपणच्या दिवसातील आठवणी आता फार अंधुकशा झाल्या आहेत , एक मात्र आठवते क्रांतीचौकात -,रंगराव देशपांडे आजोबांच्या  घराला दोन बाजूंनी पायर्या चढून येण्याचा रस्ता होता. संध्यकाळी या इथे बसून रस्त्यावरची घाई-गडबड पाहत असे , या समोरच्या रस्त्यावर मध्यभागी एक उंच खांब होता.त्यवर एक मोठा लोखंडी -दिवा , संध्यकाळ झाली की कुणी एक कर्मचारी येत असे, त्याच्या सोबत एक उंच शिडी असायची ,त्यावर चढून मग तो मोठा दिवा लावून जायचा ,क्रांतीचौकातल्या त्या मोठ्या मोकळ्या जागेत तो दिवा पाहून .समुद्रातल्य उजेड देणाऱ्या दीप-स्तंभाची आठवण होते , 

आता जिथे मोठे मार्केट ,भाजी मंडी आहे ,त्या जागी जुन्या काळी एका रांगेतली छोटी छोटी घरे होती ,यातली सगळी घरे आणि त्यातली माणसे आपसात स्नेह-संबंध असलेली ,२-४ दिवसाचा आमचा मुकाम या घरातील माणसांनी दिलेल्या एक-कप चहाने सुद्धा सार्थकी लागायचा .
त्या काळी परभणीहून जिंतूरला जाण्यासाठी प्रायव्हेट -सर्व्हिस बस-गाड्या होत्या ..आणि आताच्या रघुवीर टाकीज च्या समोरचा परिसर आहे .मार्केटचा .त्या जागेत झाडाखाली या सर्व्हिस बस थांबत, सर्व्हिसवाली माणसं ओरडून ,आवाज देऊन बोलावीत .चलो ..झरी -बोरी - जित्तूर...,या गाडीने जिंतूरला गेल्याचे स्पष्ट आठवते.

 औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे १९६० ते १९६४ येथे होतो  ..या गावात चौथी ते आठवी असे माझे शिक्षण झाले..या गावाहून वडिलांची बदली परभणीला झाली ..तिथून ही लगेच धर्माबाद ला बदली झाली .पण ऐन शैक्षणिक वर्षात असे मध्येच सोडून जाणे शक्य नव्हते ..मग आम्ही परभणीला राहिलो .

या वर्षी जिंतूर रोडवर असलेल्या मोठ्या नूतन विद्या मंदिर मध्ये -९ वीच्या वर्गातील एक विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला , तसे पाहिले तर माझे एकंच शिक्षण सलगपणे एका ठिकाणी कुठेच झाले नाही .अनेक गाव- अनेक शाळा "असा आमचा शिक्षण-प्रवास आहे. 
क्रांती-चौकातील आमच्या खानदानी घरात  पहिल्यांदाच राहण्याचा योग याच १ वर्षीय वास्तव्याने आम्हाला लाभला .
क्रांतीचौक ,गांधी-पार्क , शिवाजी चौक ,करीत सरकारी दवाखान्य समोरील रस्त्याने जिंतूर रोड ओलांडला की समोर आमची मोठी नूतन शाळा दिसत  असे, रोज पदयात्रा करीत रमत-गमत शाळेला जाणे-येणे .खूप छान वाटायचे .
मी ज्या वर्षी नूतन विद्या मंदिरचा विद्यार्थी होतो .त्या वर्षी मुख्याध्यापक होते ..गोपाळराव काळे सर , कडक शिस्तीचे सर .त्यांच्या हातून मिळालेला छ्डी-प्रसाद .खाऊन आम्ही घडलो याचा अभिमान वाटतो कारण खूप नंतरच्या काळात कळाले आणि जाणवले की गोपालराव काळे सर  एक उत्तम साहित्यिक आणि कवी असलेले व्यक्तिमत्व होते .
आज हे आठवले की वाटते अजाणतेपणी आपण एक मोठ्या साहित्यिकाच्या सहवासाला मुकलो ,

मोठ्या नूतन शाळेचे सर्वप्रिय मुख्यध्यापक म्हणून प्रसिध्द झालेले म.म. शर्मासर  ..१९६४ साली एक शिक्षक म्हणून रुजू झाले .  ", आम्ही ज्या नववी -च्या वर्गात होतो , त्या वर्गात त्यांनी त्यांच्या करिअर मधला त्यांचा पहिला तास घेतला , पुढे १९९७ साली मी माझ्या "चंदर " या पहिल्या किशोर कादंबरीचे प्रकाशन .शिक्षक -दिनी -५ सप्टेंबर ला ,नूतन विद्यामंदिर चे मुख्याध्पक झालेले - म.म.शर्मा सर यांचे हस्ते करून खूप मोठा आनंद मिळवला , हे गुरु-ऋण -आणि त्याची आठवण झाली की मन भारावून जाते.

माझ्या या वर्गातील सर्वच वर्गमित्रांची नावं मला आठवत नाहीत .कारण मी  नववी पास झालो आणि आमची बदली हैद्राबादला झाली आणि मला नूतन विद्यामंदिर सोडावे लागले ..  मोजक्या मित्रांची नावं जरूर आठवतात कारण पुढे अनेक वेळा त्यांच्या भेटी बँकेत आणि परभणीच्या साहित्यिक कार्यक्रमात होत असत.
हे वर्गमित्र  - माझा आतेभाऊ - रविकांत चौधरी , तसेच अंबादास कुलकर्णी , दिलीप वैद्य , भास्कर सरदेशपांडे , अनिल कुलकर्णी -शेल्गावकर , शिवाजी जाधव , रेणुकादास टाकळकर , दत्ता पत्तेवार  , 
असे अनेक वर्ग मित्र  आठवतात.
रविकांत, भास्कर , अंबादास ,दिलीप ,आणि मी .असे ट्युशन साठी सकाळी जायचो .आम्हाला शिकवणारे गुरुजी होते वी,भा .पाठक गुरुजी, गांधी पार्क समोर असलेल्या  पाठक गुरुजींच्या माडीवर आमची शिकवणी चालत असे.


नूतन विद्यामंदिर मध्ये कृष्णराव जामकर सर , भगवानराव मास्तर अजून ही आठवतात . या शाळेत झालेल्या ..निंबंध लेखन, भाषण करणे अशा कार्यक्रमात मी सहभागी असे, लेखनाच्या आरंभीच्या खाणखुणा मला माझ्या या शालेय वर्षात जाणवू लागल्या कारण निंबंध आणि भाषण ..यांची माझी तयार्री वेगळी आहे ,छान आहे..असे गुरुजन आवर्जून सांगत असत , शाबासकी  देतांना सर म्हणत की - जितके वाचन चांगले तितके लेखन चांगले  होत असते ",
हा संस्कार करणारे आदरणीय गुरुजन आणि नूतन विद्या मंदिर .दोन्हीना आदरपूर्वक अभिवादन करतो.

घर ते शाळा आणि शाळा ते घर करीत असतांना .मी नुसता पायी चालत येत असे नाही , तर ..चालतांना आजुबाजू दिसणाऱ्या अनेक गोष्टी पाहून त्या मना मध्ये साठवून ठेवण्याचा मला छंद होता ..
शिवाजी चौकातून डाव्या बाजूला वळाले की तो रस्ता जिंतूर रोड कडेघेऊन जातो , या वळणावर सुरुवातीला .एक प्रिंटींग प्रेस होता .सरस्वती प्रिंटींग प्रेस .असे नाव असावे .(चूक भूल माफी असावी ) , या प्रेसच्या बाजूला नागभिडे आर्ट्स ",हे छोटसे दुकान होते .पेंटर नागभिडे ..ज्याला आजच्या भाषेत "आर्टस्- स्टुडिओ " म्हणतात , या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर आखीव -रेखीव रंग-संगती साधलेले बोर्ड्स दिसायचे , 
दरवेळी मी तिथे काही क्षण थांबून त्या कलाकृती डोळ्यात साठवत असे . त्यावेळी परभणी शहरातील बहुतेक सर्व नामंकित दुकानं ,संस्था यांचे नाम-दर्शक बोर्ड .जे अतिशय सुरेख होते .त्यवर रेखीव अक्षरातले नाव पहाणे मला आवडायचे ..नागभिडे आर्ट्स ..
.इंग्रजी आणि मराठी दोन्ही एकदम बढीया .मोठी बम्बाट-अशी स्टाईल.. त्या वर्षी "एक हिंदी पिचर रिलीज झाले .हिट पण झाले ..त्याचे नाव होते - शहनाई " या पिक्चरची नायिका होती .राजश्री .या हिरोईनचे अतिशय सुरेख पोर्ट्रेट नागभिडे पेंटरनी काढलेले .जे अजून माझ्या आठवणीत तितकेच टवटवीत आहे.
पुढे साहित्यिक उपक्रमात आणि परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या शालेय जीवनातले हे कसबी -कुशल चित्रकार .नागभिडे ..माझे खूप छान मित्र झाले - कवी- गझलगायक -सूर्यभान नागभिडे .त्यांचे हे कलावंत व्यक्तिमत्व मला प्रभावित करून टाकणारे असेच आहे.
परभणीच्या या एक वर्षाच्या वास्तव्यात मी सिनेमे मात्र खूप पाहिले ..नाज मध्ये -संगम ,आणि रघुवीर मध्ये -आई मिलन की बेला .हे दोन हिट सिनेमे एकाचवेळी चालू होते ..संगम -सात आठवडे आणि आई मिलन की बेला -नऊ आठवडे चालला होता ..तुफान गर्दीतले हे सिनेमे गाण्यामुळे आठवतात .
नाझ मधला पहिला पिक्चर .शिव-पार्वती असावा .असे थोडे थोडे आठवते .. आणि महावीर टाकीज पूर्ण टीन-शेड असलेली होती ...या टोकीजमध्ये  सिनेमा सुरु होण्याच्या आधी पैगाम पिक्चर  मधले "मै क्यू ना नाचू ..हे गाणे लागत असे .
तर कम सप्टेंबर ची  फेमस धून रघुवीर मध्ये लागायची .मग बुकीन खिडकी उघडली की तिकीट घेऊन मस्त पिक्चर  पहायचे. मेरे मेहेबुब , कश्मीर की कली , दोस्ती ,दूर की आव्वाज , , सती सावित्री ,शहनाई, सगाई , एप्रिल फुल . दारासिंगचे आया तुफान , सामसन, रुस्त्मे रोम , अजित हिरो असलेला शिकारी ,आवारा बादल ....कित्ती ते पिक्च .आजचे  सदाबहार नगमे असलेले हे पिक्चर मी परभणीच्या .फेरोज महल,महावीर, रघुवीर आणि नाझ .या चार ही थिएटर मधल्या ..जमीन , बेंच आणि खुची .,  तीन ही प्रकारच्या क्लास मध्ये बसून मी हे पिक्चर एन्जोय केलेत.
असे मस्त होते हे दिवस आणि हे वर्ष ..१९६४ ..
पुढच्या लेखात .असेच खूप काही...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी -
 भाग-३ रा . 
ले- अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, October 13, 2017

लेख- कल्पना आणि अंदाज

लेखमाला -
हितगुज -
लेख- 
कल्पना आणि अंदाज ...!
------------------------------------------------------------------------
 दैनंदिन कार्यक्रमात अनेक वेळा आपण सगळेजण आयोजकाची भूमिका कधी न कधी पार पाडीत असतो..आणि अशा समारंभाचे व्यवस्थित पार पडणे , .  बरेचदा " .अनेक गोष्टींची आपल्याला कल्पना असणे आणि कल्पना नसणे , तसेच आपल्याला  "  एखाद्या गोष्टीचा अंदाज करता न  येणे आणि अंदाज चुकणे .." या दोन गोष्टीवर अवलंबून असते . याचे आणखी एक कारण असते ते म्हणजे - आपल्याला व्यावहारिक अनुभवाची आणि ज्ञानाची असलेली कमतरता ".हे कुणी मुद्दाम करत नसते ,हे ही तितकेच खरे .

आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू, जिन्नस अशा अनेक गोष्टींची कल्पना नसते की ,हे सगळे "की हे कुठे मिळते, कसे मिळते ? कितीला मिळते ? आणि मग कित्येकदा गरज नसतांना "केवळ कल्पना नसल्यामुळे ,माहितीच्या अभावी" आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते , यात पुन्हा एक गम्मत अशी असते की .आपण कुणाला विचारायला जावे तर .समोरचा खांदे उडवीत म्हणतो .."काय की बुवा ,काही कल्पना नाही ..! " कदाचित असे म्हण्यामागे .अशी एक वृत्ती असू शकते ..जाऊ द्या .कशाला उगीच मागे काही जबाबदारी लावून घ्या ?.

अंदाज असणे आणि अंदाज नसणे ..या दोन्ही गोष्टी या प्रत्यक्ष्य अनुभवावर  आधारित आहेत. अंदाज हा नेहमीच अचूक असयला हवा असा आग्रह नसतो .म्हणून आपण लगेच म्हणतो ..निदान ढोबळमानाने-"  तरी अंदाज करू या ..!
आपल्याला असे अंदाज आपल्याला करायला लागतात- केंव्हा ? जेंव्हा नियोजित कार्यक्रम वा समारंभ हे मोठ्या स्वरूपाचे असतात ,आणि यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप जास्त संख्येची असते.
एवढेच कशाला ..आपण कित्येकदा "घरच्या घरीच कार्यक्रम .ठरवतो  यात अतिशय मर्यादित संख्या असलेले पाहुणे 
येणार असतात " अशा वेळी ..सर्व गोष्टींचे प्रमाण घरातील अनुभवी याक्ती  सांगेल त्याप्रमाणे ..त्याच्या अनुभवी अंदाजानुसार केल्या जातात .ही व्यक्ती सल्ला देते की - " हे बघा ...१०० पाहुणे येणार असतील तर ..७५ मानासंना लागेल इतका केले तरी ..निभून जाईल हो..!
कारण सगळेच्या सगळे पाहुणे येतीलच असे होत नसते " त्याचा हा अंदाज जवळपास अचूक ठरणारा असतो..कारण अनुभवातून त्या व्यक्तीला असलेली नियोजनाची कल्पना आणि त्याला असलेले अंदाज -कौशल्य .

अंदाज करता येणे " तो न चुकणे " या गोष्टी निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे ..निर्णयक्षमता नसणाऱ्या व्यक्तीने ,काही कल्पना नसतांना त्याच्या अंदाजा प्रमाणे केले तर आणि कार्यक्रमाचा पचका झाला तर  ..त्याला बोलणे खावी लागतील तुला आधीच म्हणालो होतो ..नको करू करूस .तुला न कल्पना आणि  कशाचा अंदाज ! ..अरे बाबा .असे ...अंदाजे पंचे दाहो दर्शे..केल्याने कुठे जमतं असते का ?

एखाद्या विषयाची काहीही माहिती नाही ,तर कल्पना तरी कशी करता येईल ? या साठी प्राथमिक माहिती, जुजबी माहिती , कामापुरती माहिती ,सगळी माहिती , परिपूर्ण माहिती ..एव्हढे सगळे किंवा या पैकी थोडे तरी आपल्याजवळ असेल तर ..काम पूर्ण होईल की नाही ? आपण हे काम करू शकू की नाही ? याची पूर्वकल्पना करता येते आणि मग त्या अनुषंगाने .अंदाज बांधता येणे , थोडाफार अंदाज करणे , असे करीत करीत पुढच्या पायऱ्या चढून जाणे जमायला लागते .

चार माणसाच्या घरात सुद्धा हे तितकेच आवश्यक आहे ..गृहिणी व्यवहार -कशल आहे " असे जर कुणी म्हणत असेल तर खुशाल समजावे की या घरातील गृहिणीला सगळ्या गोष्टींची माहिती आहे , कुठून ,कशी खरेदी करायची याची कल्पना आहे ...तिच्या या सवयीमुळे ..घराचे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता फारच कमी असते ,

आणि अनुभव हा श्रेष्ठ गुरु"लाभला की ..त्या पाठोपाठ आपल्या व्यक्तीमत्वात अनेक चांगले गुण येऊ लागतात .
सगळी सोंगं करता येतात पण..पैश्याचे सोंग नाही करता येतं ..हे एक सर्वपरिचित सिध्द अशी म्हण प्रचीलीत आहे.
आणि पैश्याचे नियोजन ..हे नेहमीच ..अनुभवी..अंदाजातून तयार करायचे असते ..म्हणून तर याला .."वार्षिक  अंदाज पत्रक " असे ठळक नाव प्राप्त झाले आहे ते किती अचूक आणि संपर्क आहे हे जाणवते .

अंदाज "म्हणजे तरी नेमके काय ? भविष्यात नेमके असेच घडेल ..याची कल्पना आपल्याला नसतेच ..त्यामुळे काय घडू शकेल ? याचा अर्थातच अंदाज करता येत नाही .." असे आहे म्हणून .भविष्यकालीन नियोजन न करून कसे चालेल ? मग, केवळ स्व-अनुभव ,इतरांचे अनुभव ,आणि क्षमता ..यांच्या बळावर आपण ..अनेक गोष्टी ठरवतो ..त्यात आपली कल्पना आणि अंदाज .या दोन्ही गोष्टींची  परीक्षा होत असते .

जीवनाच्या या कठीण परीक्षेत ..ज्याचे ठोकताळे , अंदाज ..अचूक ठरतात ,ज्यांचे अंदाज खूप बरोबर नाही ठरले तरी फार चुकीचे ठरत नाहीत , अशा व्यक्ती ..अपयशी होण्याचे दुखः टाळण्यात नक्कीच यशवी होत असतात. याची कल्पना आपल्याला असयला हवी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- कल्पना आणि अंदाज .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, October 8, 2017

लेख- लेख-आठवणीतली गावं - लेख- क्र-१ अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!




लेख-आठवणीतली गावं –
लेख- क्र-१
अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!
मित्रहो नमस्कार ,
दैनिक दिलासा ,आणि आदरणीय विजय जोशीसर यांच्याशी अक्षर –नातेबंध जुळून आता ३५ वर्षे होऊन गेली आहेत १९८३-१९८४ साल असावे मी त्यावेळी हैद्राबाद बँकेत गंगाखेडला होतो .१५ ऑगस्ट विशेष अंकात माझी “ काचेचे हिरे “ ही कथा विजय जोशी सरांनी प्रकशित केली प्रकाशित झालेली हे माझे पहिले वाहिले प्रकाशित झालेले साहित्य.  तेंव्हा पासून सुरु झालेला माझा लेखन प्रवास आजही अखंडपणे चालू आहे , आज ही अगदी आपलेपणाने दिलासा साठी मी आनंदाने लेखन करीत असतो.
संपादक आणि मित्र –संतोष धारासूरकर यांच्याशी संवाद –भेटी नेमाने होत असतात .अशाच एका भेटीत ..आठवणीतली गावं “हा माझा लेखन-संकल्प यावर आमचे बोलणे झाले .आणि ते म्हणाले परभणीत तुम्ही खूप वर्ष होता –मग परभणी –आठवणीतले गावं .ही लेखमाला सुरु करा ,रविवार –साहित्य पुरवणीतून क्रमश ..येऊ द्या .
या रविवारपासून आपण नियमित भेटणार आहोत .त्यासाठी आरंभीच दिलासा टीमचे आभार मानतो.
माझ्या आयुष्य- प्रवासातील सर्वात मोठा पर्व-काल मी. परभणीत घालवला  ..,१९८६ ते २००६ अशी वीस वर्ष- दोन दशकं मी फेमस परभणीत होतो . मी तसा ही मुळचा परभणीकर आहे .एक लेखक म्हणून, एक बँक-कर्मचारी म्हणून आणि एक व्यक्ती –एक माणूस म्हणून मी परभणीत वावरलो ..खूप देऊ शकलो तर नाकीच नाही पण पर्भानीने सवयीप्रमाणे भभरभरून दिले आहे ..ते सर्व या लेखमालेतून येईल .ते दिवस, ती वर्षं ती माणसे या सर्वांच्या आठवणींचा –पेमाचा अक्षर जागर तुम्हाला आवडणारा ठरावा हे अपेक्षा करतो .

आजच्या लेखाच्या पहिल्या लेखातून परभणीकर म्हणून माझी पारिवारिक ओळख करून देणे योग्य राहील
१९८६ ते २००६ ही २० वर्ष मी परभणीला होतो . या काळात माझा परिचय गंगाखेडहून आलेला .हैद्राबाद बँकेतील एक कर्मचारी असा होता . माझे वास्तव्य त्यावेळी आरंभी वसमतरोडवरील रामकृष्ण नगर पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या बँक कॉलनीत होता , नंतर कारेगाव रोड ला –पाण्याच्या टाकी जवळ ..श्रीराम नगरला आमची आणखी एक बँक कोलोनी झाली ,आणि या कॉलोनीत मी माझे घर बांधले ..
४१ - वरदान “ श्रीराम नगर परभणी या वास्तूने मला खूप भरभरून दिले , माझे साहित्य लेखन या वास्तूत झाले आहे .यामुळे एक झाले ..बाहेरगावाहून आलेला मी –परभणीच्या क्रांतीचौकातला आहे ही माझी ओळख नव्या पिढीला झालीच नाही , म्हणून देखील आज हा लेख लिहिवसा वाटला
परभणीच्या वास्तव्यात माझी ओळख लेखन –धडपड करू पाहणारा आणि .मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर –प्रतिष्ठा –परभणी .या संस्थेचा एक कार्यकर्ता अशीच होती .. या दोन्ही संस्थात नियमित वावरत असतांना मला अनेक साहित्यिक आणि मित्र –लाभले –या सर्वांच्या सहवासात माझी साहित्यिक म्हणून जडणघडण झाली  साहित्य-नगरी –सम्मेलन नगरीची महती आज मी सर्वत्र मोठ्या अभिमानाने आनंदाने सांगत असतो..

आता परभणी सोडून मला अकरा वर्षे होत आहेत ..सध्या पुण्यात रहात असलो तरी ..मनाने फुल –टू-परभणीत असतो.
आजच्या लेखाचे प्रयोजन .साहित्यिक आठवणीचे नसून.माझ्या पारिवारिक –परभणीकर म्हणून तुमच्याशी शेअर करणे हे आहे. आमची पारिवारिक ओळख – लोहगावकर देशपांडे – क्रांती चौक –परभणी . ज्यांचा सहवास मला लाभला अशा माझ्या परभणीकर-पारिवारिक सदस्यांचा या लेखात उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय , अनेक माझ्या माणसांचा उल्लेख स्मरणा -अभावी होणे कठीण आहे .त्यांनी मोठ्या मनाने माझ्या विस्मरण –बुद्धीला क्षमा करावी.
आम्ही लोहगावकर देशपांडे –तसेच ताडलिंबेकर –देशपांडे ,महातपुरीकर –देशपांडे , परभणीकर –देशपांडे ,हे सर्व मंडळी क्रांतीचौकातच वास्तव्यास आहे ..सगळे आडनावंबंधू आणि तसे नातेवाईकच .
परभणीच्या क्रांतीचौकात रंगराव देशपांडे –हे संकुल आहे ते रंगराव गंगाधरराव देशपांडे –लोहगावकर हे माझे चुलत आजोबा ..या संकुलाच्या जागी रंगराव आजोबांचे वास्तव्य असलेला वाडा होता –त्यालाच “गढी “असे म्हटले जात असे रंगराव देशपांडेच्या वाड्यातच मराठीचे श्रेष्ठ –साहित्यकार बी.रघुनाथ शेजारी म्हणून राहत असत .माझे काका श्रीधर देशपांडे ..यांनी बी.रघुनाथ यांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात सांगितल्या.
रंगराव आजोबांच्या वाड्यात अलीकडच्या काळात –माझे काका श्रीधरराव देशपांडे राहत असत .त्यांच्या परिवारात सामील झालेला किशोर ब्रम्ह्नाथकर –आणि आता माझा बंधू झालेला किशोर देशपांडे –त्याची पत्नी संध्या औरंगाबाद येथे असतात ,शेतीविषय प्रयोगशीलता हा या बंधूचा विशेष आहे.
.त्याच्या बाजूला आहे ते आमच्या परिवाराचे मोठ्ठे घर ..व्यंकटराव उर्फ बालासाहेब काका यांचा वाडा ,या काकांचे चिरंजीव ..सखाराम देशपांडे –लोहगावकर –माझ्या या चुलत बंधूचे अकाली जाणे- आम्हा सर्वासाठी मोठी दुर्दैवी घटना ठरली आहे.आता या घरात आनंदी देशपांडे –लोहगावकर यांचे वास्तव्य असते
या वाड्याच्या मागच्या गल्लीत आमच्या लोहगावकर –देशपांडेच्या मोठ्ठ्या घराचा भाग आहे ,या वाड्यात १९६४ साली परभणीला वडिलांची बदली झाली तेंव्हा आम्ही आमच्या या खानदानी घरात राहिलो. मी त्या वर्षी जिंतूर रोडवरच्या मोठ्या नूतन शाळेत नववीच्या वर्गाचा विद्यार्थी होतो .माझ्या शालेय जीवनाचे एकच वर्ष परभणीला झाले.
माझ्या वडिलांचे नाव. विठ्ठल हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये होते , १९८९ मध्ये ते परभणी मुख्य शाखेत मनेजर होते .माझ्या वडिलांचे लहानपण परभणीतच गेलेले , मला आठवते दीप -प्रभाचे विठ्ठलराव पाठक , राजाभाऊ सुभेदार श्रीनिवासराव राजेंद्र “हे वडिलांचे अतिशय जिवलग मित्र होते
हनुमंतराव देशपांडे -माझे आजोबा “पांडेपण करायचे ..फुलकळस- या गावी त्यांचे वास्तव्य असायचे.या गावी आमचा वाडा आणि शेती होती .
..या गावात माझ्या बळवंत गंगाधरराव देशपांडे या आजोबांनी .श्री बजरंगबली –मारुती ची स्थापना केली ..आज पंचक्रोशीत हे मंदिर – पांड्याचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देशपांडे परिवारातील नवी पिढी मोठ्या श्रद्धेने फुलकळसला मारुती दर्शनास येत असतात . या गावासाठी बळवंतराव आजोबांचा नातू – नितीन मुरलीधर देशपांडे अनेक सामाजिक स्वरूपाच्या योजना राबवतो आहे
बळवंतराव आजोबांचे थोरले चिरंजीव म्हणजे जुन्या पिढीतील कीर्तिवंत प्राध्यापक – डॉ.के.बी .देशपांडे –केशव बलवंत देशपांडे .उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद मध्ये कार्यरत असतांना के.बी काकांना .औरंगाबाद  येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी बोलावले गेले ..हे केबी काका –बॉटनी  या विषयाचे प्राध्यापक होते ,मला आठवते शाळेत असतांना आम्हाला .वनस्पती शास्त्र “हे त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात होते .हे मोठे लेखक आपले काका आहेत” हे खूप सुखद वाटायचे .
केबी काकांची मोठी कन्या माझी मोठी चुलत बहिण मंगलताई ही -–मराठवाड्यातील पहिली महिला इंजिनियर आहे “ हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
केबी काका परभणीला अगदी नियमित येत असत ,जुनी परभणी त्यांना फार प्रिय होती.

काळाच्या ओघात आता खूप बदल झालेत .जुन्या पिढीतील जेष्ठ-पिढी आता हयात नाहीये . निसर्ग-नियमानुसार होणारी ही गोष्ट आहे...
माझे मोठे काका – दत्तात्रय हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..यांची आजची पिढी परभणीला आहे- श्री. गुंडेराव दत्तात्रय देशपांडे हे माझे मोठे चुलत बंधू – त्यांच्या परिवारातील दिनेश व त्याची पत्नी. आणि  धाकटे –चिरंजीव -.राजेश देशपांडे –संध्या देशपांडे हे दोघेजण –परभणीतील सार्वजनिक जीवनात सर्व-परिचित जोडपे आहे ..लोहगावकर देशपांडे ही ओळख त्यांनी दमदारपणे चालू ठेवली आहे .याचे मला खूप कौतुक आहे.
दुसरे मोठे चुलतबंधू भीमराव दत्तात्रय देशपांडे .जयश्री हेमाद्री –देशपांडे ,हे जोडपे -
भीमराव देशपांडे यांचे चिरंजीव – राहुल –अरुणा हे जोडपे पुण्यात असते आणि धाकटे चिरंजीव प्रसाद –- अदिती हे जोडपे बडोदा येथे असते.हा प्रसाद उर्फ पप्पू देशपांडे .आता प्रसाद भि.देशपांडे “या नावाने लेखन करणारा इंटरनेट-वरील अतिशय लोकप्रिय असा कथाकार आणि कवी आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन –मध्ये निमंत्रित कवी “म्हणून त्याचा सहभाग अभिनंदनीय असाच आहे.
भीमरावची कन्या –सौ.रसिका रमण संगमकर –नांदेडला असते
मधुकर देशपांडे- मोहिनी , यांची मुलं -राहुल आणि आरती - म्हणजे क्रांतीचौकातील आमच्या लोहगावकर देशपांडेच्या खानदानी वाड्यात राहणारे आमचे घर एक घर आहे.
भीमराव देशपांडे यांचे साडू –बंधू आणि प्रसिद्ध साहित्यिक-वक्ते – श्री .अनिल रामदासी –विद्या हेमाद्री –रामदासी –माझे पारिवारिक स्नेही आहेत ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
सर्वात मोठे चुलत बंधू लक्ष्मीकांत दत्तत्रय देशपांडे – यांचे चिरंजीव विलास नोकरी निमित्ताने औरंगबादला आहे ..त्याची पत्नी –सौ.संगीता देशपांडे ही उत्तम लेखिका आहे .परभणी-हिंगोली –नांदेड आणि आता औरंगाबाद अशा विविध ठिकाणी राहून ती विविध नियतकालिकातून नियमित लेखन करीत असते , लेखन आता इंटरनेटवर सुद्धा ती एक उत्तम वाचक आणि लेखिका म्हणून कार्यरत आहे.
माझ्या या मोठ्या बंधूंचे जावाई आहेत प्रसिध्द नाट्यकलावंत –श्री किशोर विश्वामित्रे .


माझ्या सर्वात मोठ्या चुलत भगिनी सुशीला –देशपांडे –देशमुख यांचा परिवार – सुधीर-विनोद –बाळू –(आकाशवाणी मधील )ही भाचे मंडळी आणि त्यांचा परिवार परभणीतील सार्वजनिक कार्यात परिचित आहे.
माझी धाकटी चुलत बहिण सौ.विमल –आणि श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हा परिवार परभणीत असतो .श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हे वसमतरोड परिसरातील एक सर्वप्रिय व्यक्तिमत्व आहे.
माझ्या वडिलांची मावशी –सुभेदार परिवारातील ..बबनराव सुभेदार हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ ..या बबनकाकांची नवी पिढी .त्यातला मनोज सुभेदार ..इंटरनेटवर परिचित असलेला एक लोकप्रिय मित्र आहे.
रेणुकादासराव चौधरी –सावरगावकर –हा परिवार म्हणजे वडिलांच्या बहिणीचे –वेणू-आत्याचे घर.
मोठा आतेभाऊ म्हणजे यशवंत चौधरी – म्हणजे य.रे -सर.त्यांची पत्नी –मंगला –पावडे-चौधरी आणि बाल विद्या मंदिर ,उभयतांची अशीच ओळख विद्यार्थ्यात होती . यशवंत चौधरी –माझा मोठा आतेभाऊ ..पण माझ्यासाठी अत्यंत आदरणीय य.रे –सर म्हणूनच अधिक जवळचा होता ..
पुढे निवृत्त झाल्यावर यशवंत चौधरी ..पुण्यात आल्यावर आमच्या नियमित भेटी होत असत ..
..त्याचे बाल-मित्र असलेले सुधाकर पाठक ,गोविंद कात्नेश्वारकर –हे माझे पारिवारिक मित्र म्हणून आज ही माझ्या संपर्कात असलेले परभणीकर मित्र आहेत .यशवंतचा  मुलगा –गणेश चौधरी पुण्याच्या संगीत क्षेत्रात उत्तम तबला –पटू म्हणून परिचित आहे.
माझा धाकटा आतेभाऊ , रविकांत चौधरी – याने आपल्या बहारीच्या काळात रवी टेलर्स “या नावाने परभणी आणि परिसरात आपल्या कार्याची ठळक अशी मुद्रा उमटवली होती...
रवी टेलर्स –कडे शिवलेले कपडे न वापरणारा परभणीकर –आणि कोणत्याही क्षेत्रातील नोकरदार व्यक्ती असो , १९७५- ते २००० अशा जवळपास पंचवीस वर्षांच्या काळात शोधून सापडले नसते ..इतका हा रवी-टेलर्स “चा प्रभाव होता .

आज या चौधरी परीवारतील बहुतेक सदस्य आता परभणीला नाहीत .स्वतः रविकांत चौधरी –सौ.अलका आणि त्याचा मुलगा हरीश , विवाहित मुली –रचना ,आणि रश्मी त्यांच्या परिवारासहित औरंगाबादला आहेत.माझ्या आतेबहिणी–  सौ.शोभा अशोकराव पार्डीकर , सौ.प्रभा सुधाकर जोशी ,या पुण्यातच असतात ,
सौ.सुनिता –कळंब- देशमुख परिवारात ,आणि सौ.मीना –प्रज्ञा प्रशांत आजेगावकर –नवी मुंबई ला असते.
सर्वात धाकटी आतेबहीण – सौ.ज्योती विलास आंबेकर परभणीकर झाली आहे. तिच्या सोबतच परभणीकर असलेली माझी मोठी आतेबहीण –सौ.ताई रमेश मंगरूळकर हा परिवार परभणीला असतो.
भला मोठा असा हा माझा परिवार आहे..आणि असा आहे मी परभणीकर
..बाकी पुढच्या लेखात .....
(क्रमशा ......)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------