Thursday, May 24, 2018

मिशी -उपक्रमात प्रकाशित माझी कथा - तो दिसला की ..!

मिशी उपक्रमात प्रकाशित कथा -
धन्यवाद - संयोजक - मिशी 
---------------------------------------------------------


१.


कथा -
तो दिसला की ..
-अरुण वि.देशपांडे -पुणे.



मेघनाथ हे नाव होत , चांगल्या मोठ्या घरातली व्यक्ती अशी त्याला एक ओळख होती ..सगळं काही होत .सगळ्यांना तो जवळचा माणूस वाटायचा ,म्हणून त्याला सगळेच वाड्यातला नाथा “  असे म्हणायचे .
अरे तो नाथा नाही का .तो " 
.तो नाथा ..रे ...
असे म्हटले की त्याच्याशिवाय दुसरा कुणी नाथा नावाचा माणूस नाही याची ऐकणार्याची  खात्री पटायची 

हा "नाथा ", गावातील एका श्रीमंत घराण्याचा कुलदीपक होता , अफाट संपत्तीचा मालक होता ..त्याचा हातगुण आणि पायगुण दोन्ही नशीबवान माणसाचे आहेत “ हे - तो पाळण्यात असल्या पासून सर्वांनी पाहिले होते . आज ना उद्या तोच या घराचा मालक  गावातील मोठी असामी , असे सगळे काही होणार हे पक्के होते ,आता ..हे होण्यासाठी ..तो वयाने मोठा होण्याची वाट पाहणे सुरु होते .
राजयोग नशिबी घेऊन आलेला "नाथा  मोठा होऊ लागला ..

नाथा आमच्या पेक्षा थोडा वर्षांनी मोठा , , शाळेतला सगळ्यात श्रीमंत मुलगा “,आमच्या पुढच्या वर्गात होता तो . सगळ्यांशी बोलणारा हा मुलगा मित्र म्हणून खूप छान होता., श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता त्याला . त्याच्या साठी स्वतन्त्र गाडी होती , तो एकटा कधीच येत नसे , रस्त्याने जो मित्र भेटेल त्याला गाडीत बसवून आणायचा , शाळा सुटल्यावर परत मुलांना बसवत असे गाडी मध्ये .
त्याचा वाढदिवस शाळेत आणि त्याच्या घरी ..मोठ्या वाड्यात साजरा होत असे , त्यादिवशी सगळ्या पोरांच्यासोबत आमची दोस्त कंपनी वाड्यावर जाऊन मज्जा करून यायची.

दिवस असेच मस्त चालले होते ..आणि अचानक .. नाथाची “आई “गेली , तीर्थयात्रेला गेलेल्या त्यांच्या बसला अपघात झाला आणि त्यात ..नाथाची आई त्यांच्या परिवारातील ,तसेच त्यांच्या वाड्यातील अनेकजन गेले ,
वाड्यावर , गावावर शोककळा पसरली, नाथाचे वडील तीर्थयात्रेला गेले नव्हते म्हणून ते बचावले ..हे त्यातल्या त्यात बरे म्हणयचे.

पुढे काही महिन्यात .. परिवारातील लोकांच्या सांगण्यावरून ..त्यांनी दुसरे लग्न केले , वाड्याला नव्या मालकीणबाई मिळाल्या , सामन्य घरातील त्या बाई वाड्यातील वैभवाने दिपून गेल्या ,अचानक लाभलेल्या अधिकाराने मालकीणबाई लगेच बदलून गेल्या ..आणि नाथाचे “ दिवस फिरले .. असेच सारेजण म्हणू लागले .
आज न उद्या नाथा “वारसदार म्हणून हे वैभव संभाळणार हे सर्वांना माहिती होते , सगळ्यांची याला संमती होती..नेमके हे एकमत आणि बहुमत“या दोन्ही गोष्टी नाथाच्या नव्या आईसाहेबंना खटकू लागल्या कारण त्यांच्या जवळच्या माणसांनी .हा .नाथा पुढे त्यांच्यासाठी किती अडचणीचा ठरणार आहे हे पटवून दिले , आणि हा काटा काढणे किती गरजेचे आहे हे नव्या मालकीणबाईंना पटले आणि समजले ..

एका रात्रीची गोष्ट आहे, आम्ही पोर पोर आमच्या गल्ली जवळच्या चौकात बोलत उभे होतो , समोरून जीवाच्या आकांताने ओरडत आमच्या दिशेने येणारा नाथा “ दिसला , आमच्या जवळ येऊन तो थांबला , धावत आल्यामुळे दम लागलेला नाथा बोलू शकत नव्हता , फक्त भेदरलेल्या नजरेने तो मागे वळून पाहत होता ,
एक गाडी आमच्या समोरून वेगाने निघून गेली , त्या बंद गाडीत अंधार होता, आत कोण आहेत ? हे कळाले नाही ..

आम्ही नाथाला पाणी दिले , शांत झाल्यावर त्याला विचारले ..
काय झाल नाथा ? कोण लोक होते हे ? का असे मागे लागले ? तुला मारणार होते की काय ?
नाथा सांगू लागला ..
तुम्हाला कसे सांगू ,काय सांगू ?
गेल्या काही महिन्या पासून ..वाड्यात आलेल्या नव्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली आहे ,
सगळ्या समोर गोड बोलतात , छान वागतात , आणि माझे बाबा बाहेगावी गेले की, मात्र माझा छळ करतात ,







---२---




नाथा मोठा होऊ लागला त्या दिवसात  ..त्याच्या पेक्षा आम्ही तसे लहान पोरं होतो ,..
आमच्या टोळीतील एकाने हुंगेगिरी करीत असतांना ऐकलेली बातमी ..एक दिवस आम्हाला सांगून टाकली ...त्याने आणलेली बातमी .आम्हाला धक्का देणारी होती ..
आमचा दोस्त  सांगू लागला अरे , तो  नाथा त्या वाड्यातला .. नाथा “ म्हणे ..पुरुष नाहीये ..!

सगळ्या पोरांनी दोस्ताला म्हटले.. 
काही पण .बोलत जाऊन ने बे असे कुणाबद्दल ..तुला काय माहिती रे ....
शप्पत बे .खरं सांगतोय .. तो " नाथा अगदी तसाच आहे ", हे त्याच्या जवळच्या माणसाने एकाला सांगतांना ऐकले मी ..
अन आलो की लगेच पळत तुम्हाला सांगायला .

असे ऐकल्या पासून  “नाथा “कडे पाहण्याची आमची नजर बदलून गेली ..त्याच्या जाण्या येण्याकडे , बोलण्याकडे ,दिसण्याकडे ..आम्ही बारीक नजरेने ,शोधक नजरेने पाहू लागलो ..तसे पाहिले  तर." .पुरुष नाहीये ", असा ठपका बसलेले अनेक जण गावात होते ..ते आम्हाला माहिती  होते ..पण अशा लोकांच्या कडे पाहिलं की  लगेचकळायचे ..अरे..कूच तो गडबड है,
अशी  माणसं आणि ,त्यांच्या बद्दल , समोर कमी ,माघारी मात्र नेहमीच मस्करीने बोलले जात होते , त्यातले शब्द , आमच्या सारख्या पोरांना पूर्ण समजत नसे..पण..हे नक्कीच चांगले बोलत नाहीत ..हे मात्र जाणवत असायचे.
आता यात "नाथाची  ची भर पडली ..असेच म्हणावे लागेल .

काय असते ..काही व्यक्ती ,काही माणसे ..अख्या गावाला माहिती  असतात .ती त्यांच्या समाजातील स्थानामुळे , करीत असलेल्या कार्यामुळे ..वगेरे वगेरे ..
असेच काहीसे नाथ बद्दल बद्दल येईल .
 दिसायला राजबिंडा , कोणता ही ड्रेस मध्ये तो खूप छान दिसायचा , आव्वाज एकदम भारदस्त ..फेमस फिल्मी हिरो सारखा , बोलायला लागला की ऐकत राहावे असे छान बोलायचा .थोडक्यात काय नाथा मध्ये काही प्रोब्लेम असेल अशी शंका सुद्धा कुणाला येत नसेल ..
आमच्या दोस्ताची बातमी खरी निघते की काय अशी भीती वाटू लागले ..कारण .."नाथाच्या वाड्यातून अश्या अर्थाच्या बातम्या ..पिल्लू सोडून दिल्या सारख्या .अधून मधून ..गावभर फिरू लागल्या ..


अलीकडे आमच्या गप्पात आम्ही नाथ " बद्दल बरेच बोलत होतो , कुणाला त्याच्याबद्दल काय वाटतंय याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नव्हते , आमच्या मनात नाथा बद्दल एक प्रकारचा आपलेपणा  कसा काय वाटत होता ? ..हे आम्हालाच कळत नव्हते . म्हणतात ना ..एखादा आपला कुणी नसतो ..पण..त्याच्या बद्दल आपल्याला विनाकारण आपलेपणा  वाटत असतो , त्याचे कारण पण काही देता येत नसते ..बस,आम्हाला पण नाथ बद्दल अगदी असेच  वाटते म्हणजे वाटते.

त्या दिवशीची गोष्ट ..रात्रीची वेळ .. आमच्या घराच्या ओट्यावर .बाबा आणि त्यांचे मित्र बसले होते ..त्या दिवसात ..टी व्ही आणि सिरीयल चे दिवस अजून सुरु होण्यास खूप वर्ष उजडायचे होते , लोकांना वेळ होता ..गप्पांच्या निमित्ताने का होईन ..लोक एकत्र बसत,बोलत ..भले ही त्याला ही नावं ठेवली जायची .
.
तर त्या गप्पात .अचानक  नाथा चा उल्लेख माझ्या कानावर पडला ..आणि मी सावध होऊन ..बोलणे ऐकू लागलो ..
एक काका म्हणाले .. काय म्हणावे लोकांना ..किती नीच आणि कारस्थानी , अरे केवळ पैश्या साठी ..एखाद्याला आयुष्यातून उठवत आहेत हे लोक, बघा ना .. नाथा ला काही मिळू नये..त्याचा काटा काढला  पाहिजे , या हेतूने त्याच्या बद्दल मनाला येईल ते बोलतात , बातम्या पसरवित आहेत.. पण..लोकांना खरे काय हे चांगले माहिती असते ..
नाथाच कुणी काही बिघडवू शकत नाही .
















---३---




म्हणजे ..आम्हाला ज्याच्या बद्दल आपलेपणा वाटत होता ..तो" नाथा खरेच खूप छान माणूस आहे.
पण, आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही..

अशीच मध्यरात्रीची वेळ असेल.. बाहेर मोठ्यांने आवाज ऐकू आला , दरवाजे उघडून आम्ही बाहेर रस्त्यावर आलो .. जमलेल्या लोकांमध्ये बोलणे सुरु होते
त्यावरून समजले की .. थोड्यावेला पूर्वी .. एक गाडी आली, आणि आतल्या माणसांनी ..नाथाला गाडीतून बाहेर रस्त्यवर टाकून दिले आणि पळून गेले ,
नाथाला बराच मार लागलेला दिसत होता ,

लोकांनी त्याला बसवले , पाणी दिले , धीर देत म्हणाले ..छोटे मालक ..घाबरू नका ..तुम्ही आमच्या सोबत आहेत ..काय झालं ते सांगा आम्हाला ..

नाथा सांगू लागला ..
नेहमीचाच प्रकार ..मोठे मालक बाहेरगावी गेलेत ४-५- दिवसासाठी .. मग, सगळे मिळून माझा छळ करतात , मारझोड करतात ,
आईसाहेब पहात असतात सगळा प्रकार , त्यांची संमती असते या सगळ्या गोष्टींना ..
त्या नेहमी म्हणतात मला –
नाथा नीट समजून घे .
.. हे बघ .. तू माझा कुणीही नाहीस आणि होणार ही नाही , हे सर्व माझं आहे .तुला हे कधीच काही मिळणार नाही

आमचं हे वागणे तुझ्या बाबांना हे कधीच दिसू देणार नाही , त्यांच्या समोर आम्ही तुझ्याशी आम्ही इतके चांगले वागून दाखवतो की ..त्यांना आमच्या वाईट वागण्याची शंका कधीच येणार नाही.. कुणी कितीही सांगो आमच्या बद्दल ..त्यांचा विस्वास कधीच बसणार नाही, याची काळजी आम्ही घेत राहू.
तुला मारून आम्ही मोकळे होणार नाही ..कारण असे केले तर तुझ्या बाबांना सोडून इतर सगळ्यांना हे आम्ही केलें याची पक्की खात्री असेल.
म्हणून ..तुला मरू तर देणारच नाही आणि नीट जगू पण देणार नाही .. “

तुम्हाला तर माहितीच आहे.. मोठे मालक ..त्यांना धक्का बसेल असे काही कळता कामा नये , दोन ऑपरेशन झालीत त्यांची , काळजी घेतली नाही तर ,जीवाला मोठाच धोका आहे त्यांच्या . आणि मला या सगळ्या लोकांनी देत असलेल्या त्रासाबद्दल कळाले तर त्यांच्या मनाला खूपच मोठा धक्का बसेल या भीतीमुळे सहन करण्याशिवाय माझ्या हातात काही नाहीये.
नाथाच्या स्वभाचा आणि चांगले असण्याचा मोठाच गैरफायदा त्याचीच आई घेत होती . केवळ पैसा आणि संपत्तीच्या लोभापायी नाथाच्या वाट्यास हे दिवस आले होते .या कुटील हेतूने ..नाथा “पुरुषच “नाहीये ..ही गोष्ट सगळीकडे ठरवून पसरवली जात होती , ज्यामुळे नाथाचे लग्न होणार नाही “,आणि तो एकटाच असला की त्याला त्रास देणे ,सहज सोपे होते.

नाथाची गोष्ट ऐकून सर्वांना त्याच्याबद्दल सहानुभूती होती , त्याच्या मदतीला दरवेळी कुणीतरी येत होते , पण ,वाड्यात असतांना मात्र तो नेहमीच एकटा असायचा , इतर कुणाला प्रवेश नव्हता .


अचानक –एक दिवस ..
गावात बातमी येऊन धडकली की  काल-परवा ..नाथा  " सहजपणे  वाड्याच्या गच्ची वर गेला होता  , पायर्या उतरतांना ..त्याचा कसा काय तोल गेला .कळालेच नाही ..
तो . थेट खाली आला ..
आता नेलंय मोठ्या गावाच्या दवाखान्यात कळेल लवकरच.

ही बातमी ऐकून सारे गाव हळहळत होते , लोक आपसात कुजबुजत होते ..अरे आपला नाथा पडला नाही..त्याला नक्कीच ढकलून दिले असेल ..त्या शिवाय असे होणार नाही..
आमच्या सारख्यांच्या बोलण्याला काय आणि कोण किंमत देणार ..?













---४----




बरेच दिवस झाले होते आता या गोष्टीला पण या अपघातातून नाथा " कधीच बरा होणार नाही..याची पूर्ण काळजी घेतली जाते आहे .असेच लोकांना वाटू लागले ..आणि काही महिन्यात तसेच झाले ..
वाड्यातील लोकांनी गावातील लोकांना सांगण्यास सुरुवात केली ..
पडण्याच निम्मित्त झालं , बघा ना, काय होऊन बसलाय , मेंदूला इजा झाली म्हणतात नाथाच्या .
मोठे मालक स्वतहा लेकाचं निदान करून आलेत , खूप धक्का बसलाय त्यांना तर ..हाय खाली जणू त्यांनी.

 नाथा वेडा झालाय “,त्याला काहीच समजत नाही ,काही करता येत नाही
 डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या ", आता आम्हीच सांभाळू कसे तरी त्याला . 
वेडा झाला म्हणून सोडून कसे देता येईल , त्याचे दुश्मन नाहीत आम्ही ..
असे म्हणणारे कसे आहेत ?  हे सगळ्यांना माहिती होते ..

चार दिवस लोक बोलत होते ..काही दिवसांनी  आपोआप  तेही बंद झाले ..
वाड्या समोरून जातांना .नजर वर जातेच ...वरच्या माडीवर.ग्यालरीत ..बसलेला ..तो "दिसतो .. पंख छाटूनटाकलेला जायबंदी - दिमाखदार गरुड "..इकडे तिकडे भिरभिरत असते त्याची नजर ..पण त्यात भावनाच नाहीये असे वाटते .तसे तर जो कुणी या रस्त्याने जातो, तो क्षणभ थांबून वर पाहिल्या शिवाय पुढे जात नाही, ग्यालरीत बसून असलेला नाथा दिसतो , पाहणारा मनोमन पुटपुटत पुढे जातो..”पैश्या साठी माणूस काय काय करील,? भरवसा नाही उरला रे बाबा कुणाचाच

..तो " दिसला की ..त्याला पाहून घशात हुंदका अडकल्या सारखे वाटते .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - तो दिसला की .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, May 14, 2018

आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २४ - लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ
------------------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार - परभणीच्या आठवणी लिहितांना खूप भारावून गेल्या सारखं होत असतं नेहमी , एखादा प्रसंग आठवतो , एखाद्या मित्राची आठवण होते , आणि मन पुन्हा त्या दिवसातला फेरफटका मारून येते .
आज जुन्या फायली पुन्हा एकदा संगतवार लावीत असतांना एक फायलीत मला माझे एम.ए. मराठी चे मार्क मेमो सापडले.आणि खूप छान आठवणी आठवल्या ..आज त्याच आठवणीचा हा आलेख तुमच्या साठी..
१९९८६ ते १९९६ या दरम्यान मी स्टेट बँके ऑफ हैद्राबाद च्या  नव्या मोंढा मध्ये  असलेल्या कृषी विकास शाखेत होतो .

मसाप परभणी शाखेच्या साहित्यिक उपक्रमामुळे , ग्रामीण कथा लेखक प्रा.आता (डॉ.) प्रभाकर हरकळ सर, तसेच प्रा.-कवी इंद्रजीत भालेराव सर, आणि सहर्द्य प्राध्यपक मित्र अशी ज्यांची ओळख आहे ते प्रा.अशोक खोत सर या सर्वांशी यांच्याशी माझे खूपच छान असे मैत्री -सूर जुळले होते . 
ज्ञानोपासक कोलेज नव्या मोंढ्यातील आमच्या बँके पासून तसे खूपच जवळ होते . प्रभाकर हरकळसर फावल्या वेळेत त्यांच्या स्कूटर वरून बँकेत येत ...त्यांची स्कूटर आली की .आमचा प्यून म्हणयचा ..साहेब ..तुमच्या या मित्राच्या स्कूटरचा नंबर एकच आहे. पहिल्यांदा हा योग पाहून खूप मजा वाटली.. बँकेचा फोन नंबर -२२९७  होता आणि हरकळ सरांच्या स्कूटरचा नंबर  MH-२२ - २२९७  असा होता . हरकळ सर येतांना दिसले की .कुणी तरी अगोदरच म्हणयचे .२२९७  चे सर आलेत बघा .

बँकिंग आणि कॉमर्स  विषयाचे प्राध्यापक असलेले हरकळसर बँकेत आले म्हणजे उपयुक्त संदर्भ आवर्जून माहिती करून घेत , नंतर बँकेच्या  समोर असलेल्या छोट्याश्या टपरीवर  (तेंव्हा )..धुम्रपान अधिक चहापान सेशन होत असे.

हरकळसरांचा लाभलेला सहवास साहित्यिक दृष्ट्या खूप काही देणारा असाच होता .  लेख्नाब्द्द्लची त्यांची  मत नेहमीच संयत आणि स्पष्ट असल्यामुळे साहित्य आणि लेखन याबद्दल एका अर्थाने गंभीर ऐकायला मिळत गेले " ते किती महत्वाचे आहे" हे आता समजले आणि हरकळसरा मधील जाणीवेच्या लेखकाचे दर्शन होते.
हरकल सरांनी साहित्यिक लेखन करीत असतांना शैक्षणिक ग्रंथ लेखन देखील दीर्घ काल केले . उद्योजक विकास संस्थे साठी एका वार्ता-पत्राचे   संपादन ते करीत असत 

एका  खूप छान ट्रीपची आठवण सांगतो-  मानवतला  प्रकाश मेदककरसर यांच्या मुलीचे लग्न होते , त्या लग्नाला साहित्य सम्मेलन वाटावे इतके लेखक-कवी आले होते ,  ही मंडळी येणार कारण मेदकसरांचा गोतावळा होताच खूप मोठा ,  परभणीहून अनेकजन मानवतला निघाले , अशा वेळी हरकळसर म्हणाले ..चला -अरुणराव .आपने गाडी पे जायंगे ..! 
आयडीया छानच होती ..मानवत अगदी जवळ असलेले गाव.. बँकेत रजा टाकणे वाचले . मेदककर सरांकडील कार्यास हजेरी लावून लगेच दुपारी वापीस ..असा प्लान ठरला .  २०-२५ वर्षापूर्वीचा उन्हाला आजच्या इतका भीषण नक्कीच नव्हता ..तरी त्या वर्षीच्या कडक उन्हात आम्ही मानवतला गेलो , लग्न समारंभ आणि साहित्यिक भेटी  दोन्ही खूप आनंद देणारे .प्रकाश मेदककर सरांनी केलेले आपलेपणाचे स्वागत ..हा प्रसंग मनात जशाचा तसा आहे.  त्या दिवशी दुपारी हरकळसरांना  कोलेजात ,आणि मला बँकेत येणे  आवश्यक होते 

 म्हणून लग्न घरच्या  मेजवानीचा आस्वाद  घेऊन आम्ही भरदुपारी तळपत्या उन्हात परभणीला परत निघालो , गप्पाच्या नादात ..उन्हाचे चटके बसत आहेत याचा आम्हाला विसर पडला होता , गाडी तापली म्हणून मध्येच एका ठिकाणी चहा साठी थांबून झाले .. .एरव्ही कमी आणि मोजकं बोलणारे हरकळसर नर्म -विनोदी पण बोलू शकतात याचा अनुभव मी मानवत -परभणी-मानवत या ट्रीप मध्ये घेतला ..आणि पुढे अनेक वेळा ,अनेक प्रसंगी घेतला आहे.

परभणीच्या त्यावेळच्या साहित्यिक मित्रांमध्ये कवी-मित्र बहुसंख्येने असायचे .अशा साहित्यिकात फक्त कथा लेखन करणारे  लेखक अशी ठळक ओळख हरकळसरांची होती . त्यांच्या ग्रामीण कथांनी समीक्षक आणि वाचक अशा दोघांची पसंतीची पावती मिळवलेली आहे . त्यांची नवी कादंबरी " पांगाडी " ,ग्रामीण साहित्यात लक्षवेधी ठरली आहे याचा मला खूप आनंद वाटतो.
अशीच एक आठवण - " जागतिक  कथा -शताब्दी वर्ष " होते त्या वर्षी . या निमित्ताने ..श्रीरामनगर मध्ये माझ्या घरी ..कथा लेखकांचा सहभाग असलेला एक विशेष कथा -चर्चा "असा कार्यक्रम झाला ..त्यात हरकळसरांनी कथे बद्दल खूप महत्वाचे विश्लेषक असे मनोगत व्यक्त केले होते.

एकदा हरकळसरांनी ज्ञानोपासक महाविद्यलयात .वाणिज्य विभगा तर्फे .बँक आणि कर्ज पुरवठा " या विषयावर चर्चा -सत्र आयोजित केले होते , या चर्चा सत्रात बँक -प्रतिनिधी " या स्वरूपात मी व्य्ख्यान दिले ",  माझ्या बँकेतील नोकरीत अगदी समर्पक वाटावा असा हा एकमेव योग हरकळसरां मुळे मी अनुभवला  आहे.

परभणीतील साहित्यिक उपक्रम असो ,मराठवाडा साहित्य संमेलन , परभणी जिल्हा साहित्य संमेलन .अशा सर्व उपक्रमात हरकळसर नेहमी सोबत असायचे ,एका अर्थाने त्यांच्या लेखकीय सोबतीची चांगलीच सवय झाली होती.
आता परभणी सोडून एक तप होते आहे ..पण परभणीत जे जे अनुभवले त्याला तोड नाही..
फेसबुक आणि इंटरनेटवर हरकळसर सक्रीय आहेत त्यामुळे अधून मधून भेट होते .

२०१५ -२०१६ मधली घटना .. चिरंजीवांनी फर्मान सोडले ..आपल्याला प्रत्येकाचे पासपोर्ट काढून रेडी ठेवायचे आहेत , त्या साठी शाळेचा किंवा कॉलेजचा टीसी आवश्यक आहे. माझी शाळा सुटून ५० वर्ष झालीत , शाळा हैदराबादची ,सरकारी हायस्कूल . तिथे आता मराठी मिडीयम अस्तित्वात तरी असेल की नाही ? 
मग अचानक आठवले ..आपण १९९५- १९९६ या वर्षात ज्ञानोपासक कोलेजात एम .ए .मराठी साठी विद्यार्थी म्हणून प्रवेस्च घेतला होता , या कोल्जेचा टीसी चालेल .

लगेच हरकळसरांना फोन लावला ..प्रोब्लेम  सांगितला ..आवश्यकता सांगितली ..सरांनी लगेच दुसरे दिवशी चौकशी करून पुन्हा फोन लावीत म्हटले ..या तुम्ही ..टीसी तयार असेल . तुमची सेल्फ सही आवश्यक आहे  म्हणून तुम्ही यायचे आहे.
मी ठरल्या प्रमाणे गेलो .दुपारच्या वेळी .सर वाटच पाहत होते , टीसी घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांचे सध्याचे नवे आणि मोठ्ठे घर पहिल्यांदाच पहिले , हरकळ सरांच्या मोठ्ठ्या मनाला शोभेल असेच हे घर आणि यातली माणसे आहेत , हे अगोदरही अनुभवले ,पुन्हा या नव्या घरात तेच अनुभवले .
सर, तुमच्या या मदतीने नव्या पिढीला एक उदाहरण देता आले की.. बघा पोरांनो ..अंतरीचा जिव्हाळा ..अंतरंगात सतत पाझरणारा जिवंत निर्मल झऱ्या अखंड वाहता असतो.".
प्रभाकर हरकळ सर - तुमच्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------

Monday, April 23, 2018

-आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २३ - बीबीके सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .
-----------------------------------------------------------------------
परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या वैयक्तिक जीवनात , नोकरीच्या म्हणजे बँकेतील कार्यालयीन जीवनात , आणि साहित्यिक म्हणून वावरतांना नित्यनेमाने खूप काही घडत असे , हे सर्वच दिवस उत्साहाने भरलेले होते ..रोज काही नवे घडे .ज्याने मनास उमेदीचे नवे बळ मिळत असे.
परभणीच्या साहित्यिक जगतात वडीलधार्या मंडळींचे मोलाचे मार्गदर्शन मला नेहमीच मिळत गेले , त्यांचे प्रेमाचे शब्द मला घडवीत होते ..त्यातूनच आजचा मी आहे" अशी  माझी भावना आहे.

१९९८- १९९९ .दरम्यानची ही एक स्मरण- कथा आहे, वीस वर्ष होत आली  आहेत आता या प्रसंगाला , पण आठवणीच्या रूपाने मनात अजून जशाचा तसा आहे हा प्रसंग  ,
१९९८  या वर्षा पर्यंत माझे ..१.कुरूप रंग , २.रंग तरंग , ३,नवर्यांची चाळ( विनोदी कथा )  असे तीन कथा - संग्रह प्रकाशित झालेले होते . या नंतर एक नव्या कथा संग्रहाची तयारी सुरु केली होती ..त्याच वेळी संग्रहाची प्रकाशन तारीख ठरवली होती .."बी.रघुनाथ स्मृतिदिन - दि. ०७ सप्टेंबर, वर्ष होते १९९९ . प्रकाशक ही मिळाले होते .संजय सप्लायर्स (प्रकाशन ) पुणे .
कथा -संग्रहाचे नाव होते  "अनुपमा ", 
या संग्रहाला एका कथा - लेखकाची प्रस्तावना घायची "अशी माझ्या मनात खूप इच्छा होती , असे साहित्यिक बाहेरगावचे कशाला ? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारून त्यावर उपाय शोधला , आपल्या परभणीच्या साहित्यिक परिवारातील एका जेष्ठ साहित्यिकांना विचारू या , त्यांचा होकार सहज मिळेल 'अशी खात्री होती.

त्या दिवसात एकदा औरंगाबादला जाण्यासाठी मी परभणी रेल्वे स्टेशनवर आलेलो होतो , वीस वर्षापूर्वी परभणी स्टेशनवर येणाऱ्या रेल- गाड्यांची संख्या तशी मोजकीच होती ..,आणि वेळेवर येणे " हा नियम तेंव्हा तितका कडक नव्हता असे आता आठवते . वेळापत्रकानुसार गाडी येणे " तशी एक नवलाची गोष्ट "असे " , असे म्हटले तरी चालण्यासारखे होते , अशा वातावरणात एक घंटा देरीसे चलनेवाली गाडी " अजून किती उशिरा येते ? या काळजीत असतांना ,माझ्या सोबत रेल- गाडीची वाट पहाणाऱ्यात  एका स्नेह्याची भर पडली होती ..

माझ्या बाजूला उभे होते .मराठवाड्यातील विनोदी  कथा लेखन करणाऱ्या मोजक्याच साहित्यिकात  ज्यांचा उल्लेख केला जात असे ते .प्रा.भास्कर कुलकर्णीसर. ज्यांना त्यांचा परभणी-  मित्र परिवार ..बीबीके या नावाने ही बोलवत असे .
त्यांनापाहून मला अतिशय आनंद झाला होता ..कारण माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवण्याचा योग मोठ्या अनपेक्षितपणे माझ्या वाटयाला आला होता.. 

त्या दिवशी बीबीके सर औरंगाबादला  निघाले होते , मी पण औरंगाबाद पर्यंत आहे म्हटल्यावर त्यांना बरे वाटले 
एक तासा पेक्षा अधिक उशीर न लावता त्या दिवशी आमची रेलगाडी आली .
गर्दीतून वाट काढीत बसण्यासाठी जागा मिळवणे " हे प्रवासी -कौशल्य परभणीकरांना उपजतच लाभेली देणगी आहे ,त्यामुळे आम्हाला बसण्यास जागा लगेच मिळवता आली.
गप्पा सहजपणे सुरु झाल्या  साहित्यिक घडामोडींवर सरांचे लक्ष असते ." हे त्यंच्या बोलण्यातून जाणवत होते .ते .म्हणाले .तुमच्या सारख्या नव्या साहित्यिक मित्राशी बोलून ,नवी माहिती तरी मिळेल आम्हाला .
 . आम्ही गेल्या पिढीतले म्हणजे जेष्ठ साहित्यिक झालो , कुणे असे म्हणू लागले की आम्हाला उगीचच भीती वाटते हो देशपांडे ,-
 वाटते -  यापुढे आपल्याला  मान्यवर उपस्थित म्हणून खुर्चीवर बसवले जाईल , काय सांगावे -  आजकाल कशाचा भरवसा नाही राहिला बघा , तुम्हाला म्हणून सांगितले..
नाही हो सर , असे काही होणार नाही , कथा लेखन ते ही .विनोदी ..तुम्ही अगदी निष्ठेने हा लेखन प्रकार लिहिता आहात , याकडे कसे दुर्लक्ष करता येईल ? तुमच्या मनात असे विचार ही येऊ नयेत असे मला वाटते.
थोड्या वेळाने मी त्यांना म्हणालो .. सर , मी एक कथा लेखक आहे, माझा विनोदी कथा संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे ",
त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी देत म्हटले .तुमच्या लेखनाकडे माझे लक्ष आहेच अरुणराव , बँकेतला माणूस लेखन करतो याचे कौतुक आहे मला . सरांच्या या कौतुकांच्या शब्दाने मी भारावून गेलो , सर, एक विनंती आहे आणि इच्छा सुद्धा , ती तुम्ही पूर्ण करावी ..,
सर म्हणाले ..आधी सांगा तर खर , मग ठरवू .काय करायचे ते .
लगेच मी म्हणालो .., असे काही करू नका सर, मला माझ्या नव्या कथा संग्रहासाठी तुमची प्रस्तावना हवी आहे,
 एका विनोदी कथा लेखकाची प्रस्तावना गंभीर कथांच्या संग्रहाला असावी " हे माझी कल्पना सरांना ऐकून पटली नसावी अशी भीती मनात होती ...पण, सर म्हणाले .. , मी तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो ,काळजी करू नका .
अरुणराव, बाहेरगावचे मोठे मोठे साहित्यिक तुमच्या ओळखीचे असतांना , तुम्ही मलाच कसे काय विचारताय ? हे मात्र विचारतो तुम्हाला ..
सर, तो प्रश्नच नाही .. माझ्या नित्य परिचयाच्या वडीलधार्या साहित्यिकाची प्रस्तावना घ्यायची  हे मी मनोमन ठरवले होते ..,हे पक्के झाल्यावर  तुमच्याशिवाय अन्य कुणाचाही विचार केला नाही ,त्यांमुळे अनेकांना विचारून शेवटी तुमच्याकडे आलो असे मुळीच नाहीये .फक्त आणि फक्त तुम्हालाच या संदर्भात बोलतो आहे मी.
माझ्या सांगण्यातला खरेपणा सरंना जाणवला असेल , ते म्हणाले..
ठीक  आहे , तुमच्या कथांची फाईल माझ्याकडे आणून द्या ,वाचून प्रस्तावना देतो.
सरांच्या या एका वाक्याने माझा तो प्रवास सार्थकी लागल्याचे समाधान मनाशी बाळगून ,दोन चार दिवसांनी मी परभणीला परतलो.
लगेच माझ्या नव्या संग्रहाच्या कथा अनुक्रमणिके नुसार लावून .१५ कथांची फाईल घेऊन सरांच्या शास्त्रीनगर येथील घरी गेलो . अत्यंत भक्तिभावाने ती फाईल श्री गुरुचरणी ठेवतो आहे अशी भावना त्यावेळी माझ्या मनात होती .सरांचे त्या वेळी दिवाळी अंकासाठीचे कथा लेखन चालू होते , त्यांच्या लेखनात अडथला आणला कि काय ? ही माझी भीती सरांनी ओळखली असावी .म्हणाले ..
असे अवघडून बसू नका , आपल्या परभणीला मोकळं वातावरण आहे ,बाहेरच्या सारखं नाही इथे, ही फार चांगली गोष्ट आहे अरुणराव.
हो सर , हे मात्र खरे  आहे , आपल्या परभणी सारखे साहित्यिक वातावरण बाहेर कुठेच नाहीये " असे बाहेरगावाहून आलेले आपले साहित्यिक मित्र सांगत असतात..
सरांना फाईल देत म्हटले ..केंव्हा येऊ मी प्रस्त्वाना घेण्यसाठी ? लास्ट-वीक मध्ये प्रकाशकांना पोंचली पाहिजे .बाकी सगळं तयार आहे .
सर म्हणाले .१५ तारखेला या तुम्ही आणि प्रस्तावना घेऊन जा .
विनोदी कथा लेखक प्रा.भास्कर कुलकर्णी यांनी बरोबर १५ दिवसांनी त्यांची प्रस्तावना मला दिली , अतिशय अनुरूप अशी प्रस्त्वाना सरांनी लिहिली होती . या प्रस्तावनेतील निवडक ओळी .ब्लर्ब " वर सुद्धा छापल्या .
त्यातील मोजक्या ओळी इथे देण्याचा मोह टाळणे कठीण आहे..
" अरुण वि.देशपांडे यांच्या कथा मानवी जीवनाच्या निरनिराळ्या संघर्षाचा शोध घेणाऱ्या आणि विविध भूमिकातून माणसे कसे जीवन जगतात याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत.
" नियतीशरण जीवन हे या संग्रहातील कथांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणवे लागेल .आकर्षक आणि लक्षवेधी कथा वाचकांच्या पसंतीस उतरतील असा विस्वास वाटतो .
त्यांच्या साहित्य प्रवासास आशीर्वाद व हार्दिक शुभेच्छा.
- प्रा.भास्कर कुलकर्णी 
" क्षितीज ", शास्त्रीनगर ,
परभणी .

मित्रहो बीबीके  उर्फ प्रा.भास्कर कुलकर्णी सरांच्या आशीर्वादाने माझे साहित्य लेखनाचे क्षितीज आता तर या इंटरनेटवर खरोखरच विस्तारत जाते आहे. .

सरांच्या शास्त्रीनगरच्या घरी  अनेक वेळा मी गेलो आहे , साहित्य विषयक गप्पा करीत त्यांच्यातील लेखक अनुभवला आहे . अनेक साहित्य संमेलनात त्यांचा कथा कथन सत्रात सहभाग हा ठरलेला असे. मी माझे कथा कथन पहिल्यांदा सादर केले ते  वसमतला झालेल्या पहिल्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनात . 
या संमेलनाचे अध्यक्ष होते कथाकार प्रा. तू.शं,कुलकर्णी सर.

या समेलनात झालेल्या  कथा-कथन सत्रात प्रा.भास्कर कुलकर्णीसरांनी देखील त्यांची विनोदी कथा सादर  केली होती. सरांच्या बरोबर माझा असाच आणखी एक सहभाग योग - आखाडा बाळापुर ला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील कथा -कथन कार्यकमात आला .

प्रा.भास्कर कुलकर्णीच्या विनोदी कथा लेखनाचे विश्व एका अर्थाने मर्यादित होते .  आपल्या अवतीभवतीच्या सध्या -सरळ आणि मानवी प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा वाचकांना भावणार्या होत्या "भाम्पास " नावाची व्यक्ती -रेखा त्यांच्या कथेचे मध्यवर्ती पात्र असे. सरांचे हे विनोदी लेखन मनाला एक वेगळा आनंद देणारे होते.असे मी आवर्जून म्हणेन.

सरांचे अचानक जाणे ", हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धक्का होता , एका अबोल मनोवृत्तीच्या सृजनशील साहित्यिक व्यक्तीमात्वाचे जाणे साहित्यिक क्षेत्राला  मोठीच हानी पोन्च्व्णारे  होते.

या लेखाच्या निमिताने बीबीके सरांच्या चिरंजीव यांना  एक सुचवावेसे वाटते की. प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या साहित्याचा ब्लोग तयार करून इंटरनेट वरील वाचकांना प्रा.भास्कर कुलकर्णी या विनोदी कथा लेखकाचे साहित्यिक कार्य नव्या पिढीसाठी उपलब्ध करून द्यावे . सरांच्या वाण्ग्मयीन कार्याची   दखल घेतली जाईल ,
प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या स्मृतीस व साहित्यिक लेखन कार्यास हे शब्दरूप अभिवादन अर्पण करतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------

Saturday, April 21, 2018

लेखमाला -आठवणीतल गाव- परभणी , लेख- २२ वा. "कवी - नारायण बोरूळकर ..!

लेखमाला 
-आठवणीतल गाव- परभणी ,
 लेख- २२ वा. 
"कवी - नारायण बोरूळकर   ..!
-----------------------------------------------------------
आठवणीचे क्षण , सहवासातले दिवस , मनात कायमचे साठवलेले असतात , ज्यांच्या सोबत असे काही प्रसंग आपण शेअर केलेलं असतात की ते अविस्मरणीय असे झालेले असतात . अशी माणसे, अश्या व्यक्ती आपल्या मनात चिरंतन स्वरूपात वास करीत असतात . 
मित्र हो, समान आवडी आणि विचार जुळून आले की आपले एख्य्द्या व्यक्तीशी खूप छान जमते ,आपला गुड फ्रेंड  असलेला इतरांशी तितक्याच मोकळेपणाने वागेल " असे पण नसते , याला व्यक्ती तितक्या प्रकृती  "असे म्हणून सोडून देणेच  चांगले असते" अशी धारणा माझ्या मनाची अगदी पहिल्या पासूनची बनत गेलेली आहे.

परभणीच्या माझ्या वास्तव्यात .वैयक्तिक आणि नोकरीच्या आयुष्य पेक्षा माझ्या साहित्यिक जगात खूप मोठी हलचल असे , घर आणि बँके पेक्षा ..साहित्य, लेखन, आणि साहित्य उपक्रम यांनी मला सतत सक्रीय ठेवले ..त्यामुळे ३०-३५ वर्षे होऊन गेलीत पण अजून ही मी परभणीचे साहित्यिक विश्व आणि त्यातल्या माझ्या मित्रांना विसरू शकत नाही हेच खरे.

परभणीच्या साहित्यिक वर्तुळात .त्यावेळी .वयाने आणि साहित्यिक अधिकाराने जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक स्नेही होते, समवयस्क मित्रांची मोठीच फळी होती , तर तरुण वयात उत्तम लेखनाने वेधक कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांची संख्या देखील खूप  होती. ही सर्व मंडळी माझे मित्र म्हणूनच परिचित होते . जे नित्य नेमाने भेटत ,ते अधिकच जवळचे वाटणारे "हे साहजिक होते 

अशाच एक जवळच्या मित्राचे स्मरण आजच्या लेख निमित्ताने करावेसे वाटते आहे..
१९९०-९२ च्या दरम्यान मराठवाडा रविवार पुरवणीतून .परभणीतील साहित्यिक मित्रांची व्यक्ती-चित्रण ..ही लेखमाला मी लिहिली होती .. या लेखमालेतील ..एक लेख होता .."राजस सुकुमार " या शीर्षकाचा ..
हे शीर्षक वाचून जुन्या मित्रांना चटकन  नक्कीच आठवण होईल ..
त्या सुकमार मित्राचे नाव . "कवी - नारायण बोरूळकर   ..! 
  .
सरकारी कार्यालयात नोकरीत असणारे " नारायण बोरूळकर   ..! . मनाने नखशिखांत कवी " होते . गोरेपान , छोटीशी मूर्ती ,आणि चेहेर्यावर - कायम संकोच , "मी कसा बोलू, ?, भिडस्तपणा इतका की..त्यांच्या या स्वभावाने -   नारायण बोरूळकर   ..!  या व्यक्तीने स्वतःतील कलावंताला  नेहमीच मागे मागे राहू दिले , एक अनाकलनीय संकोच या माणसाच्या मनात का आणि कशामुळे आहे ? कधीच कळाले नाही.

रस्त्याने जाताना येतांना  अचानकच - समोरून त्यांच्या लहानश्या लुनावर हळू स्पीडमध्ये येणारे नारायणराव दिसायचे . ते न थांबता -न बोलता सरळ पुढे गेले असे कधीच व्हयाचे नाही .रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीवर आम्ही समोर समोर बसून बोलायचो .

..त्यांचे बोलणे होई पर्यंतचा आमचा वेळ फक्त त्यांच्यासाठीचा असायचा .  ते .भेटायचे तेंव्हा हातात हात घेऊन बोलत , तो स्पर्श कधी कधी खूप उदासवाणा वाटणारा असे, त्यांच्या शब्दात एक भिजलेपण जाणवत असे, आणि डोळे नि:शब्द नि डबडबलेले , मग समजून घायचे .या नाजूक कवीला व्यावहारिक जगातील कुणा रुक्ष आणि कोरड्या मनाच्या माणसाने विनाकारणच दुखावलेले आहे...

"कवी - नारायण बोरूळकर   ..!  ..मराठवाड्यात सर्वपरिचित होते ..त्यांचा कवी-मित्र परिवार खूप मोठा होता . रविवार साहित्य पुरवणी , मासिके , दिवाळी अंक ..यातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असत ..कधी कधी त्यांची कविता प्रकाशित झालेल्या अंकात माझे साहित्य प्रकाशित झालेले असे ..हा आनंद त्यांच्या सोबत साजरा करतांना ..मी म्हणायचो ..
"आज  "कवी - नारायण बोरूळकर   ..! " यांचे सोबत ..माझी कविता , आहे ..
.वा नारायणराव आज हम खुश.
त्यांना ही अशी दाद खूप आवडत असे .. एकदम दिलखुलास हसून नारायणराव मान डोलावत .

फिक्या रंगाचा फुल बाह्यांचा खिसेवाला बुशकोट , अंगात  फीट बसणारी  डार्क रंगाची प्यांट , अशा रंगसंगतीचे ड्रेस गोर्यापान नारायणराव बोरुलकरांना खूप शुभून दिसत असत , सुरुवातीला सायकलवर ते फिरत असत , नतर त्यांच्याकडे लुना आली ..तरी त्यांच्या ..नाजूक व्यक्तिमत्वाला भरधाव जातांना कधी पाहिले नाही.

देविदास कुलकर्णी , मोहन मु.कुलकर्णी .यांच्यामुळे मला "कवी - नारायण बोरूळकर  यांचा  सहवास घडला  नारायण बोरुलकर यांना आपल्या  "देविदास" चे खूप कौतुक होते . नरहर कुरुंदकर सर, डॉ.प्रभाकर मांडे सर म्हणजे "कवी - नारायण बोरूळकर यांचे श्रद्धा -स्थान होते..

९१ व्या - अ.भा.मराठी साहित्य सम्मेलन बडोदाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत देशमुख नव्वदच्या दशकात परभणीला होते ..देशमुख साहेबांनी काही विशेष उपक्रमासाठी म्हणून खास नारायण बोरुलकरयांची निवड करून  त्यांच्यावर माहिती संपादन करण्याचे ,संकलन करण्याचे कार्य सोपवले होते ,आणि साक्षरता विषयक मासिकाच्या संपादक - मंडळात  "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांचा समावेश केला "असे आठवते .
 या  कार्यकालात .. "कवी - नारायण बोरूळकर   .मनाने आतून मोहरून आले आहेत असे आम्हाला जाणवत होते " जणू त्यांच्या क्षमतेची खरी कदर झाली  आहे ", अशी त्यांची भावना झाली होती.या दिवसातील त्यांचा आनंदी आणि समाधानी चेहेरा मी कधीच विसरू शकत नाही.

लोक -संस्कृती  आणि लोककला " हा "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांच्या पीएचडी चा विषय ..पण त्यांचे हे स्वप्न त्यांची सत्व परीक्षा पहात असे. कधी कौटुंबिक जबाबदारी , कधी नोकरीतील जबाबदारी  ..यात त्यांचे स्वप्न पूर्ण होणे लांबत जाई , त्यवेळी त्यांच्या मनाला खूप त्रास होतोय हे जाणवायचे ..पण ते शब्दातून व्यक्त करण्याचे नेहमीच टाळले . एक चिकाटी , एक जिद्द त्यांच्या मनात होती हे मात्र नक्की .
२००० नंतरच्या वर्षात कार्यालयीन आणि कौटुंबिक व्यस्ततेमुळे माझा   साहित्यिक मित्र-मंडळीत वावर तसा बराच कमी झाला होता .
आणि मग ..२००६ साली तर स्वेच्छा निवृत्ती घेऊन ..मी पुण्यात आलो.. "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांची भेट पुन्हा झालीच नाही ..बातम्या मात्र कानावर येत गेल्या .. त्यात .त्यांची पीएचडी " झाल्याची बातमी सुखद होती. " डॉ- "कवी - नारायण बोरूळकर   ..! कसे छान वाटत होते.

आणि एक दिवस .कळाले ते फार यातना देणारे होते .. आपला राजस सुकुमार कवी -मित्र ..आपले साहित्य - कविता मागे सोडून दूरदेशी निघून  गेला .... . "कवी - नारायण बोरूळकर   ..! तुमची आठवण मनात कविते सारखीच आहे. 

बहुदा गेल्यावर्षीची गोष्ट  असेल ही - ,
सकाळी सकाळी एक फोन आला .नंबर सेव्ह नव्हता .म्हणजे कुणी तरी नवीन आहे ..हे लक्षात आले.
मी -बोलतेय - 
तुमचे मित्र -   "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांची मुलगी , पुण्यातच असते मी , फेसबुक वर दिसलात तुम्ही , माझ्या बाबांचे खूप जुने मित्र ...,तुम्ही परभणीला यायचे तेंव्हा आम्ही खूप लहान होतो , खूप वर्ष झाली आता या गोष्टीला .
आज माझे लग्न आहे, तुम्ही नक्की या काका ....
फोनवर तर हो म्हणलो .. नाही तरी कसे म्हणू ?
पण .त्या दिवशी बाहेरगावी असल्यामुळे जाता नाही आले ..रुखरुख तसीच आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला 
-आठवणीतल गाव- परभणी ,
 लेख- २२ वा. 
"कवी - नारायण बोरूळकर   ..!
--------------------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतलं गाव - परभणी - लेख - २१ वा - गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग - तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.

लेखमाला -आठवणीतलं  गाव - परभणी -
लेख - २१ वा -
गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग -
तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.
----------------------------------------------------------------------
आठवणीतल्या गावातील अनेक आठवणी .मग कधी त्या व्यक्तीबद्दलच्या असतील , एखद्या वास्तू  बद्दलच्या असतील ,या आठवणींना एक नवा उजाळा देणे आणि मनाला त्या क्षणांची अनुभूती देणे ..हा तसा म्हटला तर मोठाच भावनीक आनंद आहे . प्रस्तुतच्या  लेखनांतून आपल्याला तो घेता येतोय असे मी समजून चालतो आहे.

परभणीचे साहित्य -जगत हे कधीच फक्त परभणी पुरते मर्यादित राहिलेले नाही..त्याने व्यापलेला अवकाश फार मोठा आहे ,अवघे मराठी साहित्य "यात परभणीचे नाव चांगल्या ठळक अक्षरातले आहे ", ही गोष्ट आपल्या मनाला आनंद देणारीच आहे.
१९८५ नंतर माझ्या सारखे अनेक नवोदित साहित्यिक परभणी शहरात वास्तव्यास आले , आणि लगेच इथल्या वातावरणात सहजतेने एकरूप झाले . मराठवाडा साहित्य परिषेद शाखा परभणी ..त्या वेळेसच्या कार्यकारणीत अनेक नवे कार्यकर्ते दाखल झाले . मसाप परभणी नेहमीच उपक्रमशील असते ", हे वाक्य त्यंनी अनेक उपक्रमाचे आयोजन करून सोदाहरण दाखवून दिले .
या कार्यकारिणीतील  एक नव्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ..ही व्यक्ती होती दीपक हवालदार , परभणीच्या त्यावेळेसच्या साहित्यिक घडामोडीत यांचा मोठाच सक्रीय सहभाग आकर्षणाचा विषय झाला होता. साहित्यिक उपक्रम आणि साहित्यिक भेटी गाठी मुळे दीपक हवालदार सर्वांचे चांगले मित्र झाले "हे आश्चर्याचे नव्हते.

दीपक हवालदार आणि परिवार हिंगोलीचे रहाणारे ,आणि हिंगोली माझी सासुरवाडीचे गाव ..हवालदार परिवार आणि आमची सासुरवाडी .बसोले परिवार .दोन्ही खूप स्नेह संबंध असलेले परिवार ..त्यामुळे परभणीच्या वास्तव्यात दीपक हवालदार आणि परिवार यांचा सहवास माझ्यासाठी माझ्या बायकोच्या माहेरची माणसे असाच होता. 

दीपक हवालदार यांनी त्यांचे  बी.रघुनाथ प्रकाशन नुकतेच सुरु केले होते ..त्यावेळी त्यांनी प्रकाशित केलेली २-३- पुस्तके चांगलीच चर्चेत होती-
१.आम्ही काबाडाचे धनी - कविता  इंद्रजीत भालेराव ,
२. तफावत - केशव बा. वसेकर 
३. नाटककार बेंडे - व्यक्ती आणि वांग्मय - प्रा.भास्कर कुलकर्णी ,
परभणीकर साहित्यिक यांच्या साठी परभणीत साहित्य संमेलन होणे "हा  एक परिचित साहित्यिक सोहोळा असे.अशातच 
१९९३ या वर्षात आमच्यासाठी  महत्वाची साहित्यिक घटना घडली ..त्याचे श्रेय दीपक हवालदार आणि बी.रघुनाथ प्रकाशन यांनाच आहे अशी माझी भावना आहे. त्याचे असे झाले की..

 परभणीचे साहित्यिक-सुपुत्र बी.रघुनाथ यांचा स्मृती -दिन ०७ सप्टेंबर  या निमित्ताने त्यांच्या ४० व्या स्मृती-दिनी म्हणजे ०७ सप्टेंबर -. १९९३ रोजी दुसरे - परभणी जिल्हा साहित्य सम्मेलन . लोकल परभणीला आयोजित केले गेले 
या साहित्य संमेलनाच्या  निमित्ताने दीपक हवालदार यांनी त्यांच्या बी.रघुनाथ प्रकाशना तर्फे ..३ नव्या लेखकांच्या पुस्तक प्रकाशनची घोषणा  केली ..

हे तीन लेखक .आणि त्यांची पुस्तके -
.१.मंगेश उदगीरकर -ललित लेख- गप्पाष्टक     २.देविदास कुलकर्णी -कथा संग्रह - रानशिन्या , आणि ३ -रा लेखक मी-अरुण वि.देशपांडे - कथासंग्रह - रंग तरंग.
या पुस्तकांची मुखपृष्ठे  चित्रकार सूर्यभान नागभिडे यांनी तयार केली होती.

या पुस्तकांच्या निर्मितीची कथा चित्त-थरारक अशीच आहे ..जणू काल परवाच घडल्या सारखी वाटणारी ..
मंगेश उदगीरकर ,देविदास कुलकर्णी आणि मी ..तीन ही लेखक .आता पुस्तक रुपात प्रकाशित होणार या कल्पनेत ,एका अर्थाने हवेतच होतो . आमच्या तीनही पुस्तकाचे छपाई काम औरंगाबादच्या लेसर कॉम,अविम ऑफसेट, "यांच्याकडे होते ..

संमेलन ८-१५ दिवसावर आलेले ,आणि पुस्तकांची प्रगती समक्ष डोळ्याने पहावी , मजकुरात काही दुरुस्ती असेल तर ती समक्ष बसून करवून घेऊ "म्हणून मी आणि मंगेश उदगीरकर असे दोघे औरंगाबादला  गेलो. पुस्तकाचे काम चालू होते त्या ठिकाणी गेलो .. मंगेश आणि देविदास या दोघांच्या  पुस्तकांची स्क्रिप्ट आणि फायनल प्रुफ लगेच सापडली आणि त्यांचे तपासणीचे काम मार्गी लागले ..आमचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही.. कारण .नंतर .माझ्या कथा संग्रहाचे काहीच रेकॉर्ड ऑफिस मध्ये सापडले नाही , ..कोने- कोपरे शोधून झाले , 
जो तो एक दुसर्याकडे बोटे दाखवूत म्हणू लागला ..परवा तर होतं की इथं , आमचे तर अवसान गळाले ..शेवटी असे ठरले  की ..काही उपयोग नाही, २ पुस्तके होतील ,त्यांचेच प्रकाशन करू , ३ रे पुस्तक ,काहीच कळत नाही ,द्या सोडून मग.पाहू ..
पण ओफिसातील एक पोरगा म्हणाला ..थांबा ..काल एक सेट  वाचायला म्हणून माझ्या घरी घेऊन गेलो , आज परत आणायचा विसरलो ..ती फाईल  नक्कीच या तिसर्या पुस्तकाची  असणार . त्याचं नाव नाही लक्षात आता..
त्याचे ऐकून इतका वेळ माझा बंद झालेला आवाज ..एकदम खुलून आला ..मोठ्यांने म्हणलो..बाबा रे ..माझच पुस्तक आहे ते ..रंग तरंग ., पळत जा ..रिक्षा कर .आणि लगेच येरे बाबा ...
लगोलग ते प्रोगा ..आमच्यासाठी अक्षर-दूत .आला की परत.. त्याच्या हातात फाईल होती ..

मंगेश ने अधिरतेने फाईल घेत पाहिले ..मोठ्या आनंदात म्हणाला ..अरे अरण्या - तुझीच फाईल ए की बे ..! 
च्यामारी ..सुटलो रे बाबा ..आता काही काळजी नाही .होतंय आपल काम ..लागू दे किती वेळ आता .डोन्ट वरी..
आणि मग मंगेश ने त्याच्या हातातील काळ्या बागेतील सुपारी आणि तंबाखूचा मस्त बार भरला ..आणि थेट संध्याकाळ पर्यंत एक आसन स्थिर चित्त होऊन आम्ही तीन ही पुस्तकाची प्रुफे ओक्के करून टाकली .
झालेले काम पाहून मंगेश म्हणाला ..यंव यंव रे यंव ..मायला आपण लेखकू झालोत की रे ..

त्या दिवशी .परभणीला जाण्यासाठी आम्हाला शिर्डी -करीमनगर ही आंध्र -प्रदेशची सुपर बस मिळाली  खरी ..पण एक ही जागा शिल्लक नव्हती ..त्यामुळे थेट परभणी पर्यंत मी व मंगेशने  गर्दीत उभे राहून तो प्रवास केला ..हे ५-६ तास आम्ही दोघच गाण्याच्या भेंड्या खेळत खेळत परभणीला पोंचलो ..नव्या पुस्तकाच्या आगमनाच्या बातमीने मन सुखावून गेलेले  होते ..त्यामुळे प्रवासाचा शीण ..बिलकुल नाही..असो.

७ सप्टेंबर १९९३ .नटराज नाट्यमंदिर - दुसरे परभणी जिल्हा साहित्य संमेलन ..या संमेलनात  आदरणीय प्राचार्य राम शेवाळकर सरांच्या हस्ते .. गप्पाष्टक - मंगेश उदगीरकर , रानशिन्या - देविदास कुलकर्णी , रंग तरंग - अरुण वि.देशपांडे , अशा तीन लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले ..
दीपक हवालदार आणि बी.रघुनाथ प्रकाशन .ही दोन्ही नावे आमच्या सर्वांच्या मनात कायम आहेत.

मित्र हो ..या सप्टेंबर मध्ये या संमेलन आठवणीस ,आमच्या पुस्तक प्रकाशन आठवणीस २५ वर्ष होतील ..एक गोष्ट आवर्जून सांगेन ..आज ही आम्ही तिघे  ..मंगेश, देविदास आणि मी ..लिहिते साहित्यिक आहोत ..
परभणीच्या साहित्य जगाची आम्हास मिळालेली  अद्भुत देणगी आहे.
पुढच्या लेखात असेच अजून काही....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतलं  गाव - परभणी -
लेख - २१ वा -
गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग -
तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------