लेखमाला -
आठवणीतील गाव- परभणी -
भाग-३ रा .
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ ------------------------------ ----------
मित्र हो नमस्कार ,
या लेखनास आपल्या प्रतिक्रिया खूप प्रोत्साहन देणाऱ्या आहेत ,या बळावर हे लेखन करणे खूप आनंददायक आहे.
सध्या दिवाळी चालू आहे .या निमित्ताने आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
परभणीकर असूनही तसा दूर दूर राहिल्यामुळे असल्यामुळे लहानपणापासून पाहिलेल्या परभणीच्या आठवणीत एक सलगपणा असा नाहीये .तरीपण मला लख्खपणे आठवतात अशा काही आठवणी आठवून तुमच्याशी शेअर करणे खूप छान वाटणारे असेच आहे.
मी ८-१० वर्षे वयाचा होतो ती वर्ष आहेत १९५८ -१९६० या दरम्यानची ,जवळपास पन्नस वर्षापूर्वीचे हे दिवस आहेत.,
१९५० ते १९६० अशी दहा वर्ष माझे वडील .मानवत च्या हैद्राबाद बँकेत हेड-कॅशियर होते. या दिवसात परभणीला येणे असायचे ,पण इतक्या लहानपणच्या दिवसातील आठवणी आता फार अंधुकशा झाल्या आहेत , एक मात्र आठवते क्रांतीचौकात -,रंगराव देशपांडे आजोबांच्या घराला दोन बाजूंनी पायर्या चढून येण्याचा रस्ता होता. संध्यकाळी या इथे बसून रस्त्यावरची घाई-गडबड पाहत असे , या समोरच्या रस्त्यावर मध्यभागी एक उंच खांब होता.त्यवर एक मोठा लोखंडी -दिवा , संध्यकाळ झाली की कुणी एक कर्मचारी येत असे, त्याच्या सोबत एक उंच शिडी असायची ,त्यावर चढून मग तो मोठा दिवा लावून जायचा ,क्रांतीचौकातल्या त्या मोठ्या मोकळ्या जागेत तो दिवा पाहून .समुद्रातल्य उजेड देणाऱ्या दीप-स्तंभाची आठवण होते ,
आता जिथे मोठे मार्केट ,भाजी मंडी आहे ,त्या जागी जुन्या काळी एका रांगेतली छोटी छोटी घरे होती ,यातली सगळी घरे आणि त्यातली माणसे आपसात स्नेह-संबंध असलेली ,२-४ दिवसाचा आमचा मुकाम या घरातील माणसांनी दिलेल्या एक-कप चहाने सुद्धा सार्थकी लागायचा .
त्या काळी परभणीहून जिंतूरला जाण्यासाठी प्रायव्हेट -सर्व्हिस बस-गाड्या होत्या ..आणि आताच्या रघुवीर टाकीज च्या समोरचा परिसर आहे .मार्केटचा .त्या जागेत झाडाखाली या सर्व्हिस बस थांबत, सर्व्हिसवाली माणसं ओरडून ,आवाज देऊन बोलावीत .चलो ..झरी -बोरी - जित्तूर...,या गाडीने जिंतूरला गेल्याचे स्पष्ट आठवते.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे १९६० ते १९६४ येथे होतो ..या गावात चौथी ते आठवी असे माझे शिक्षण झाले..या गावाहून वडिलांची बदली परभणीला झाली ..तिथून ही लगेच धर्माबाद ला बदली झाली .पण ऐन शैक्षणिक वर्षात असे मध्येच सोडून जाणे शक्य नव्हते ..मग आम्ही परभणीला राहिलो .
या वर्षी जिंतूर रोडवर असलेल्या मोठ्या नूतन विद्या मंदिर मध्ये -९ वीच्या वर्गातील एक विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला , तसे पाहिले तर माझे एकंच शिक्षण सलगपणे एका ठिकाणी कुठेच झाले नाही .अनेक गाव- अनेक शाळा "असा आमचा शिक्षण-प्रवास आहे.
क्रांती-चौकातील आमच्या खानदानी घरात पहिल्यांदाच राहण्याचा योग याच १ वर्षीय वास्तव्याने आम्हाला लाभला .
क्रांतीचौक ,गांधी-पार्क , शिवाजी चौक ,करीत सरकारी दवाखान्य समोरील रस्त्याने जिंतूर रोड ओलांडला की समोर आमची मोठी नूतन शाळा दिसत असे, रोज पदयात्रा करीत रमत-गमत शाळेला जाणे-येणे .खूप छान वाटायचे .
मी ज्या वर्षी नूतन विद्या मंदिरचा विद्यार्थी होतो .त्या वर्षी मुख्याध्यापक होते ..गोपाळराव काळे सर , कडक शिस्तीचे सर .त्यांच्या हातून मिळालेला छ्डी-प्रसाद .खाऊन आम्ही घडलो याचा अभिमान वाटतो कारण खूप नंतरच्या काळात कळाले आणि जाणवले की गोपालराव काळे सर एक उत्तम साहित्यिक आणि कवी असलेले व्यक्तिमत्व होते .
आज हे आठवले की वाटते अजाणतेपणी आपण एक मोठ्या साहित्यिकाच्या सहवासाला मुकलो ,
मोठ्या नूतन शाळेचे सर्वप्रिय मुख्यध्यापक म्हणून प्रसिध्द झालेले म.म. शर्मासर ..१९६४ साली एक शिक्षक म्हणून रुजू झाले . ", आम्ही ज्या नववी -च्या वर्गात होतो , त्या वर्गात त्यांनी त्यांच्या करिअर मधला त्यांचा पहिला तास घेतला , पुढे १९९७ साली मी माझ्या "चंदर " या पहिल्या किशोर कादंबरीचे प्रकाशन .शिक्षक -दिनी -५ सप्टेंबर ला ,नूतन विद्यामंदिर चे मुख्याध्पक झालेले - म.म.शर्मा सर यांचे हस्ते करून खूप मोठा आनंद मिळवला , हे गुरु-ऋण -आणि त्याची आठवण झाली की मन भारावून जाते.
माझ्या या वर्गातील सर्वच वर्गमित्रांची नावं मला आठवत नाहीत .कारण मी नववी पास झालो आणि आमची बदली हैद्राबादला झाली आणि मला नूतन विद्यामंदिर सोडावे लागले .. मोजक्या मित्रांची नावं जरूर आठवतात कारण पुढे अनेक वेळा त्यांच्या भेटी बँकेत आणि परभणीच्या साहित्यिक कार्यक्रमात होत असत.
हे वर्गमित्र - माझा आतेभाऊ - रविकांत चौधरी , तसेच अंबादास कुलकर्णी , दिलीप वैद्य , भास्कर सरदेशपांडे , अनिल कुलकर्णी -शेल्गावकर , शिवाजी जाधव , रेणुकादास टाकळकर , दत्ता पत्तेवार ,
असे अनेक वर्ग मित्र आठवतात.
रविकांत, भास्कर , अंबादास ,दिलीप ,आणि मी .असे ट्युशन साठी सकाळी जायचो .आम्हाला शिकवणारे गुरुजी होते वी,भा .पाठक गुरुजी, गांधी पार्क समोर असलेल्या पाठक गुरुजींच्या माडीवर आमची शिकवणी चालत असे.
नूतन विद्यामंदिर मध्ये कृष्णराव जामकर सर , भगवानराव मास्तर अजून ही आठवतात . या शाळेत झालेल्या ..निंबंध लेखन, भाषण करणे अशा कार्यक्रमात मी सहभागी असे, लेखनाच्या आरंभीच्या खाणखुणा मला माझ्या या शालेय वर्षात जाणवू लागल्या कारण निंबंध आणि भाषण ..यांची माझी तयार्री वेगळी आहे ,छान आहे..असे गुरुजन आवर्जून सांगत असत , शाबासकी देतांना सर म्हणत की - जितके वाचन चांगले तितके लेखन चांगले होत असते ",
हा संस्कार करणारे आदरणीय गुरुजन आणि नूतन विद्या मंदिर .दोन्हीना आदरपूर्वक अभिवादन करतो.
घर ते शाळा आणि शाळा ते घर करीत असतांना .मी नुसता पायी चालत येत असे नाही , तर ..चालतांना आजुबाजू दिसणाऱ्या अनेक गोष्टी पाहून त्या मना मध्ये साठवून ठेवण्याचा मला छंद होता ..
शिवाजी चौकातून डाव्या बाजूला वळाले की तो रस्ता जिंतूर रोड कडेघेऊन जातो , या वळणावर सुरुवातीला .एक प्रिंटींग प्रेस होता .सरस्वती प्रिंटींग प्रेस .असे नाव असावे .(चूक भूल माफी असावी ) , या प्रेसच्या बाजूला नागभिडे आर्ट्स ",हे छोटसे दुकान होते .पेंटर नागभिडे ..ज्याला आजच्या भाषेत "आर्टस्- स्टुडिओ " म्हणतात , या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर आखीव -रेखीव रंग-संगती साधलेले बोर्ड्स दिसायचे ,
दरवेळी मी तिथे काही क्षण थांबून त्या कलाकृती डोळ्यात साठवत असे . त्यावेळी परभणी शहरातील बहुतेक सर्व नामंकित दुकानं ,संस्था यांचे नाम-दर्शक बोर्ड .जे अतिशय सुरेख होते .त्यवर रेखीव अक्षरातले नाव पहाणे मला आवडायचे ..नागभिडे आर्ट्स ..
.इंग्रजी आणि मराठी दोन्ही एकदम बढीया .मोठी बम्बाट-अशी स्टाईल.. त्या वर्षी "एक हिंदी पिचर रिलीज झाले .हिट पण झाले ..त्याचे नाव होते - शहनाई " या पिक्चरची नायिका होती .राजश्री .या हिरोईनचे अतिशय सुरेख पोर्ट्रेट नागभिडे पेंटरनी काढलेले .जे अजून माझ्या आठवणीत तितकेच टवटवीत आहे.
पुढे साहित्यिक उपक्रमात आणि परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या शालेय जीवनातले हे कसबी -कुशल चित्रकार .नागभिडे ..माझे खूप छान मित्र झाले - कवी- गझलगायक -सूर्यभान नागभिडे .त्यांचे हे कलावंत व्यक्तिमत्व मला प्रभावित करून टाकणारे असेच आहे.
परभणीच्या या एक वर्षाच्या वास्तव्यात मी सिनेमे मात्र खूप पाहिले ..नाज मध्ये -संगम ,आणि रघुवीर मध्ये -आई मिलन की बेला .हे दोन हिट सिनेमे एकाचवेळी चालू होते ..संगम -सात आठवडे आणि आई मिलन की बेला -नऊ आठवडे चालला होता ..तुफान गर्दीतले हे सिनेमे गाण्यामुळे आठवतात .
नाझ मधला पहिला पिक्चर .शिव-पार्वती असावा .असे थोडे थोडे आठवते .. आणि महावीर टाकीज पूर्ण टीन-शेड असलेली होती ...या टोकीजमध्ये सिनेमा सुरु होण्याच्या आधी पैगाम पिक्चर मधले "मै क्यू ना नाचू ..हे गाणे लागत असे .
तर कम सप्टेंबर ची फेमस धून रघुवीर मध्ये लागायची .मग बुकीन खिडकी उघडली की तिकीट घेऊन मस्त पिक्चर पहायचे. मेरे मेहेबुब , कश्मीर की कली , दोस्ती ,दूर की आव्वाज , , सती सावित्री ,शहनाई, सगाई , एप्रिल फुल . दारासिंगचे आया तुफान , सामसन, रुस्त्मे रोम , अजित हिरो असलेला शिकारी ,आवारा बादल ....कित्ती ते पिक्च .आजचे सदाबहार नगमे असलेले हे पिक्चर मी परभणीच्या .फेरोज महल,महावीर, रघुवीर आणि नाझ .या चार ही थिएटर मधल्या ..जमीन , बेंच आणि खुची ., तीन ही प्रकारच्या क्लास मध्ये बसून मी हे पिक्चर एन्जोय केलेत.
असे मस्त होते हे दिवस आणि हे वर्ष ..१९६४ ..
पुढच्या लेखात .असेच खूप काही...
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------
लेखमाला -
आठवणीतील गाव- परभणी -
भाग-३ रा .
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------------