Monday, December 31, 2018

#चंदर - (बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग- ११ वा.

#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग -११ वा 
-----------------------------------------------------------------------------
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा,
त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता.
कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,"त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी 
परीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते .
"या बातमीने त्याच्या मनावर मोठाच आघात केला . चंदरला सरांनी फार मोठा भावनिक आधार दिला होता , त्याला योग्य मार्गदर्शन 
करणाऱ्या सरांचा सहवास आता मध्येच संपणार होता ", ही त्याच्या दृष्टीने फार वाईट गोप्ष्टी होती.

त्याला भेटल्यावर त्या दिवशी -सर बोलतांना म्हणाले - "चंदर , तुझ्या पदवी परीक्षेच्या वेळी, आणि नंतरच्या निकालासाठी  मी इथे नसणार.
पण मनाने नेहमी मी तुझ्याजवळच असेन ". वाडीसारख्या आडवळणाच्या गावातून आलेला एक गरीब मुलगा ", म्हणून तू पहिल्यांदा मला 
भेटलास , त्यावेळी मला वाटले , " हा काय शिकणार आहे ? ",राहील चार दिवस आणि अभ्यासाचा कंटाळा करून जाईल गावाकडे परत ",
पण ,असे झाले नाही .
चंदर , माझा अंदाज तू पार खोटा ठरवलास ", याचा मला फार आनंद वाटतो . तुझ्या मनात असलेली शिकण्याची तीव्र इच्छा ", मला जाणवत गेली,
तुझ्यातला एक जिद्दी विद्यार्थी मला जवळून पहायला मिळाला . मी माझ्या कुवतीप्रमाणे जमेल तसे सर्वप्रकारे सहकार्य केले, ते करतांना माझ्या 
मनात एकच भावना होती, ती म्हणजे तुझ्या सारख्या गरजू मुलाला मी मदत करतो आहे, जी पुढे नक्कीच सार्थकी लागणार आहे ",
यापुढे ही सतत तुझी आठवण येईल मला ."

सरांचे हे बोलणे ऐकून घेत चंदर म्हणाला -
" सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं , त्याची परतफेड कोरड्या शब्दात मी करू शकत नाही. एक नक्की - तुम्ही जर मला आधार दिला नसता तर 
हा चंदर इथपर्यंत पोंचू शकला नसता ."
सरांनी चंदरच्या पाठीवरून हात फिरवला , त्या स्पर्शाने ,चंदरच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू ओघळत राहिले ".
काही महिन्यानंतर , नोकरी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी चंदरचे सर  हे शहर सोडून आपल्या गावी रहाण्यासाठी म्हणून निघून गेले. त्यांच्या  जाण्याने 
"आपल्या जीवनात एक मोठी पोकळीच निर्माण झाली आहे " , हे त्याला जाणवत होते.

परीक्षेचे विचार मनात येत ", त्यावेळी चंदर ला वाटे , " ही परीक्षा आपल्या एकट्याची परीक्षा नाही, तर, ही परीक्षा बापूच्या गरिबीची होती ,"
गीरीजेच्या त्यागाची होती , रावसाहेबांच्या प्रेमाची ही परीक्षा होती . " .चांगल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून जगणाऱ्या गुरुजींच्या ध्येयवादी आयुष्याची ही 
परीक्षा होती ". या सर्वासाठीच्या असणाऱ्या परीक्षेत आपण पास झालेच पाहिजे तरच ,आतापर्यंतच्या आपल्या वाटचालीला काही अर्थ राहील ".

परीक्षा सुरु झाली , प्रत्येक पेपरा आपण चांगल्या प्रकारे सोडवला आहे " असे चंदरला वाटत होते. बघता बघता परीक्षा संपली , त्यानंतर उद्या तो 
वाडीला परतणार होता. खोलीवर आलेल्या चंदरच्या डोळ्यासमोर या शहरात तो पहिल्यांदा आला तो दिवस उभा रहात होता -
"चौथीच्या परीक्षादेण्यासठी म्हणून चंदर गुरुजींच्या बरोबर आला , आणि त्यानंतर याच शहरात कॉलेजमध्ये जायला मिळेल ", असे वाटले नव्हते .
हे सारे घडले ते केवळ -
रावसाहेबांच्या उदारपणा मुळे, त्यांच्या मनाच्या श्रीमंतीमुळे ", आणि त्यांनी गुरुजींना वाडीत आणले नसते तर ? 
,आजचा चंदर घडलाच नसता .
खरेच - गुरुजी वाडीत आलेच नसते तर ? 
वाडी कधीच बदलली नसती. लोक तसेच राहिले असते .
पंढरी , गणेश - व्यंकटी  यांचे आयुष्य जनावरांना चरायला घेऊन जाण्यातच संपले असते. अशा विचारातच चंदरला झोप लागली होती.

दुसऱ्या दिवशी चंदर गावी परतला , आता अभ्यासाची भीती नव्हती . आई-बापूंच्या बरोबर राहण्याचा आनंद तो घेणार होता. प्रत्येक भेटणारा त्याला 
विचारीत होता - चंदर, आता पुढे काय करणार आहेस ? 
या प्रश्नाला .. निकाल लागल्यावर ठरवू की ,अजून विचार केला नाही काहीच ,हे उत्तर देऊ लागला.
आणि कधी त्याला वाटे की -
निकाल जर चांगला लागला नाही तर ? 
कल्पनेनेच चंदर ची छाती धडधड करू लागे. सर्वांच्या अपेक्षांच्या नजरा चंदरवर होत्या , त्याच्या गुरुजींना तर 
चंदरकडून चांगला निकाल हवा होता. तर रावसाहेबांना वाटायचे .चंदर हाच गावातील पहिला पदवीधर होणार आहे.".
या अपेक्षा जाणवून चंदर ला मात्र स्वतहाच्या निकालाची भीतीवाटू लागली. दर दिवस उत्सुकतेचा उजाडत  होता.

त्यादिशी रावसाहेब शहरातून परतले ते मोठ्या आनंदात. आल्याबरोबर त्यांनी माणूस पाठवून 
गुरुजींना, वहिनींना , बापूला - गिरिजेला  आणि चंदरला 
वाड्यावर बोलावून घेतले , गावातील इतर माणसे ही  जमा झाली.

बैठीकीत सारेजण जमा झाले . रावसाहेबांनी चंदरला बोलावून स्वतहाच्या बाजूला बसवून घेतले . आणि ते सर्वांना सांगू लागले -
सारे जीवाचे कान करून ही बातमी ऐका मंडळी - 
"आपला चंदर पदवी परीक्षा फक्त पासच झालेला नाही , तर "तो विद्यापीठातून पहिला आला आहे ", कुलपतींचे सुवर्ण-पदक ", त्याने पटकावले आहे."
हे पहा चंदरला विद्यापीठाकडून आलेले हे पत्र " !

सऱ्या पंचक्रोशीत असे यश आज पर्यंत कुणाला मिळवता आले नव्हते ".
चंदरला प्रेमाने घट्ट धरीत रावसाहेब म्हणाले -
चंदर ,आज मलाच नव्हे तर साऱ्या वाडीला ,आजूबाजूच्या लहान मोठ्या गावांना तुझा अभिमान वाटतो आहे..

हे सर्व ऐकून ,पाहून चंदरच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धाराच सुरु झाल्या. "एवढे भव्य यश मिळेल याची त्याला कल्पना नव्हती ,अपेक्षाही नव्हती . हे यश 
म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाचे फळ होते ".

बापू आणि गिरिजा हे सगळं पाहून हरवून गेले होते. गिरीजेच्या डोळ्या समोर अजून ही शाळेचा हट्ट करणारा तिचा छोटुला - चंदर दिसत होता.
शेवटी - गुरुजी म्हणाले..
"चंदर , आपण सारेजण पदवीदान समारंभाला जाऊ या. तुझे कौतुक पहाण्याची संधी आम्ही मुळीच सोडणार नाही.

आणि ज्या दिवशी पदवी-समारंभ पार पडणार होता.. त्या दिवशी..
स्वतहा -रावसाहेब , गुरुजी , बापू आणि चंदर ", असे चौघेजण विद्यापीठात हजार राहण्यासाठी निघाले ......
 क्रमशा " : पुढे सुरु...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग -११ वा   
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment