लेखमाला
लेखमाला
-आठवणीतल गाव- परभणी ,
लेख- २२ वा.
"कवी - नारायण बोरूळकर ..!
------------------------------ -----------------------------
आठवणीचे क्षण , सहवासातले दिवस , मनात कायमचे साठवलेले असतात , ज्यांच्या सोबत असे काही प्रसंग आपण शेअर केलेलं असतात की ते अविस्मरणीय असे झालेले असतात . अशी माणसे, अश्या व्यक्ती आपल्या मनात चिरंतन स्वरूपात वास करीत असतात .
मित्र हो, समान आवडी आणि विचार जुळून आले की आपले एख्य्द्या व्यक्तीशी खूप छान जमते ,आपला गुड फ्रेंड असलेला इतरांशी तितक्याच मोकळेपणाने वागेल " असे पण नसते , याला व्यक्ती तितक्या प्रकृती "असे म्हणून सोडून देणेच चांगले असते" अशी धारणा माझ्या मनाची अगदी पहिल्या पासूनची बनत गेलेली आहे.
परभणीच्या माझ्या वास्तव्यात .वैयक्तिक आणि नोकरीच्या आयुष्य पेक्षा माझ्या साहित्यिक जगात खूप मोठी हलचल असे , घर आणि बँके पेक्षा ..साहित्य, लेखन, आणि साहित्य उपक्रम यांनी मला सतत सक्रीय ठेवले ..त्यामुळे ३०-३५ वर्षे होऊन गेलीत पण अजून ही मी परभणीचे साहित्यिक विश्व आणि त्यातल्या माझ्या मित्रांना विसरू शकत नाही हेच खरे.
परभणीच्या साहित्यिक वर्तुळात .त्यावेळी .वयाने आणि साहित्यिक अधिकाराने जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक स्नेही होते, समवयस्क मित्रांची मोठीच फळी होती , तर तरुण वयात उत्तम लेखनाने वेधक कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांची संख्या देखील खूप होती. ही सर्व मंडळी माझे मित्र म्हणूनच परिचित होते . जे नित्य नेमाने भेटत ,ते अधिकच जवळचे वाटणारे "हे साहजिक होते
अशाच एक जवळच्या मित्राचे स्मरण आजच्या लेख निमित्ताने करावेसे वाटते आहे..
१९९०-९२ च्या दरम्यान मराठवाडा रविवार पुरवणीतून .परभणीतील साहित्यिक मित्रांची व्यक्ती-चित्रण ..ही लेखमाला मी लिहिली होती .. या लेखमालेतील ..एक लेख होता .."राजस सुकुमार " या शीर्षकाचा ..
हे शीर्षक वाचून जुन्या मित्रांना चटकन नक्कीच आठवण होईल ..
त्या सुकमार मित्राचे नाव . "कवी - नारायण बोरूळकर ..!
.
सरकारी कार्यालयात नोकरीत असणारे " नारायण बोरूळकर ..! . मनाने नखशिखांत कवी " होते . गोरेपान , छोटीशी मूर्ती ,आणि चेहेर्यावर - कायम संकोच , "मी कसा बोलू, ?, भिडस्तपणा इतका की..त्यांच्या या स्वभावाने - नारायण बोरूळकर ..! या व्यक्तीने स्वतःतील कलावंताला नेहमीच मागे मागे राहू दिले , एक अनाकलनीय संकोच या माणसाच्या मनात का आणि कशामुळे आहे ? कधीच कळाले नाही.
रस्त्याने जाताना येतांना अचानकच - समोरून त्यांच्या लहानश्या लुनावर हळू स्पीडमध्ये येणारे नारायणराव दिसायचे . ते न थांबता -न बोलता सरळ पुढे गेले असे कधीच व्हयाचे नाही .रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीवर आम्ही समोर समोर बसून बोलायचो .
..त्यांचे बोलणे होई पर्यंतचा आमचा वेळ फक्त त्यांच्यासाठीचा असायचा . ते .भेटायचे तेंव्हा हातात हात घेऊन बोलत , तो स्पर्श कधी कधी खूप उदासवाणा वाटणारा असे, त्यांच्या शब्दात एक भिजलेपण जाणवत असे, आणि डोळे नि:शब्द नि डबडबलेले , मग समजून घायचे .या नाजूक कवीला व्यावहारिक जगातील कुणा रुक्ष आणि कोरड्या मनाच्या माणसाने विनाकारणच दुखावलेले आहे...
"कवी - नारायण बोरूळकर ..! ..मराठवाड्यात सर्वपरिचित होते ..त्यांचा कवी-मित्र परिवार खूप मोठा होता . रविवार साहित्य पुरवणी , मासिके , दिवाळी अंक ..यातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असत ..कधी कधी त्यांची कविता प्रकाशित झालेल्या अंकात माझे साहित्य प्रकाशित झालेले असे ..हा आनंद त्यांच्या सोबत साजरा करतांना ..मी म्हणायचो ..
"आज "कवी - नारायण बोरूळकर ..! " यांचे सोबत ..माझी कविता , आहे ..
.वा नारायणराव आज हम खुश.
त्यांना ही अशी दाद खूप आवडत असे .. एकदम दिलखुलास हसून नारायणराव मान डोलावत .
फिक्या रंगाचा फुल बाह्यांचा खिसेवाला बुशकोट , अंगात फीट बसणारी डार्क रंगाची प्यांट , अशा रंगसंगतीचे ड्रेस गोर्यापान नारायणराव बोरुलकरांना खूप शुभून दिसत असत , सुरुवातीला सायकलवर ते फिरत असत , नतर त्यांच्याकडे लुना आली ..तरी त्यांच्या ..नाजूक व्यक्तिमत्वाला भरधाव जातांना कधी पाहिले नाही.
देविदास कुलकर्णी , मोहन मु.कुलकर्णी .यांच्यामुळे मला "कवी - नारायण बोरूळकर यांचा सहवास घडला नारायण बोरुलकर यांना आपल्या "देविदास" चे खूप कौतुक होते . नरहर कुरुंदकर सर, डॉ.प्रभाकर मांडे सर म्हणजे "कवी - नारायण बोरूळकर यांचे श्रद्धा -स्थान होते..
९१ व्या - अ.भा.मराठी साहित्य सम्मेलन बडोदाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत देशमुख नव्वदच्या दशकात परभणीला होते ..देशमुख साहेबांनी काही विशेष उपक्रमासाठी म्हणून खास नारायण बोरुलकरयांची निवड करून त्यांच्यावर माहिती संपादन करण्याचे ,संकलन करण्याचे कार्य सोपवले होते ,आणि साक्षरता विषयक मासिकाच्या संपादक - मंडळात "कवी - नारायण बोरूळकर ..! यांचा समावेश केला "असे आठवते .
या कार्यकालात .. "कवी - नारायण बोरूळकर .मनाने आतून मोहरून आले आहेत असे आम्हाला जाणवत होते " जणू त्यांच्या क्षमतेची खरी कदर झाली आहे ", अशी त्यांची भावना झाली होती.या दिवसातील त्यांचा आनंदी आणि समाधानी चेहेरा मी कधीच विसरू शकत नाही.
लोक -संस्कृती आणि लोककला " हा "कवी - नारायण बोरूळकर ..! यांच्या पीएचडी चा विषय ..पण त्यांचे हे स्वप्न त्यांची सत्व परीक्षा पहात असे. कधी कौटुंबिक जबाबदारी , कधी नोकरीतील जबाबदारी ..यात त्यांचे स्वप्न पूर्ण होणे लांबत जाई , त्यवेळी त्यांच्या मनाला खूप त्रास होतोय हे जाणवायचे ..पण ते शब्दातून व्यक्त करण्याचे नेहमीच टाळले . एक चिकाटी , एक जिद्द त्यांच्या मनात होती हे मात्र नक्की .
२००० नंतरच्या वर्षात कार्यालयीन आणि कौटुंबिक व्यस्ततेमुळे माझा साहित्यिक मित्र-मंडळीत वावर तसा बराच कमी झाला होता .
आणि मग ..२००६ साली तर स्वेच्छा निवृत्ती घेऊन ..मी पुण्यात आलो.. "कवी - नारायण बोरूळकर ..! यांची भेट पुन्हा झालीच नाही ..बातम्या मात्र कानावर येत गेल्या .. त्यात .त्यांची पीएचडी " झाल्याची बातमी सुखद होती. " डॉ- "कवी - नारायण बोरूळकर ..! कसे छान वाटत होते.
आणि एक दिवस .कळाले ते फार यातना देणारे होते .. आपला राजस सुकुमार कवी -मित्र ..आपले साहित्य - कविता मागे सोडून दूरदेशी निघून गेला .... . "कवी - नारायण बोरूळकर ..! तुमची आठवण मनात कविते सारखीच आहे.
बहुदा गेल्यावर्षीची गोष्ट असेल ही - ,
सकाळी सकाळी एक फोन आला .नंबर सेव्ह नव्हता .म्हणजे कुणी तरी नवीन आहे ..हे लक्षात आले.
मी -बोलतेय -
तुमचे मित्र - "कवी - नारायण बोरूळकर ..! यांची मुलगी , पुण्यातच असते मी , फेसबुक वर दिसलात तुम्ही , माझ्या बाबांचे खूप जुने मित्र ...,तुम्ही परभणीला यायचे तेंव्हा आम्ही खूप लहान होतो , खूप वर्ष झाली आता या गोष्टीला .
आज माझे लग्न आहे, तुम्ही नक्की या काका ....
फोनवर तर हो म्हणलो .. नाही तरी कसे म्हणू ?
पण .त्या दिवशी बाहेरगावी असल्यामुळे जाता नाही आले ..रुखरुख तसीच आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
लेखमाला
-आठवणीतल गाव- परभणी ,
लेख- २२ वा.
"कवी - नारायण बोरूळकर ..!
------------------------------ ------------------------------ --------------
No comments:
Post a Comment